घनःश्याम कडू
उरण : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे दिवंगत नेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा ठराव ठाकरे सरकारने पारित केला. त्यापाठोपाठ एकनाथ शिंदे-फडणवीस सरकारनेदेखील दि. बां. च्या नावाने ठराव नव्याने पारित केला. मात्र, या घडामोडीला दोन वर्षाचा उलटूनही त्यावर अंतिम निर्णय झालेला नाही. यामुळे नवी मुबंई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नामकरण कधी होईल? असा सवाल जनता करीत आहे. लवकरच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे. त्यामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नामकरणाचे वादळ घोंगावत रहाणार आहे. मात्र राजकीय पक्ष व उमेदवार त्यांच्या नावाचा वापर करून मतांचा जोगवा मतदारांकडे मागतील.
विधानसभा निवडणुक झाल्यानंतर नवी मुबंई आंतरराष्ट्रीय विमानतळास नक्की कोणाचे नाव लागते याकडे जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. लोकनेते दि.बां. पाटील यांच्या नावासाठी येथील स्थानिक एकवटून लाखोंच्या संख्येने मोर्चे, निदर्शने तसेच आंदोलने केल्यानंतर शासनास नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नावाने स्वतंत्र ठराव करावा लागला होता. मात्र नामकरणाबाबत शासन स्तरावर अंतिम निर्णय झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
विमानतळाला हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा ठराव सिडकोने पारित केल्यानंतर नामकरणाच्या वादाला सुरुवात झाली. या दरम्यान शिवसेना विरुद्ध प्रकल्पग्रस्त असा काही काळ संघर्षदेखील झाला. मात्र, शेवटी ठाकरे सरकारनेदेखील दि.बां.च्या नावावर ठराव करून या वादावर पडदा टाकला. त्यानंतर सत्तातंर होऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले. या सरकारने ठाकरे सरकारने घेतलेला नामकरणाचा ठराव रद्द करून तो पुन्हा नव्याने दि. 16 जुलै 2022 रोजी घेतला होता. त्याला जवळपास 2 वर्षांचा अवधी उलटूनही नामकरणाचे घोंगडे आजतागायत भिजत पडले आहे. लोकसभा निवडणुका होऊन पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तिसर्यांदा सरकार रविवार दि. 9 जुलै रोजी स्थापन झाले आहे. त्यामुळे आता तरी नवी मुबलक आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकनेते दि. बा. पाटील असे नामकरण कधी होईल असे वाटत होते. परंतु तसे काही आजतागायत झालेले दिसत नाही. आतातर विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होणार आहे. त्यामुळे लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावांचा घोंगडे भिजत रहाणार असल्याचे उघड होत आहे.
यावरून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास कोणाचे नाव मिळणार हे सध्या तरी गुलदस्त्यात आहे. विधानसभा निवडणुकीनंतर नामकरण कोणाच्या नावे होते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.