निजामपूर येथील पत्रकार परिषदेत बोलताना बाबूशेठ खानविलकर यांनी स्पष्ट केली भूमिका
सलीम शेख
माणगाव : आ. भरत गोगावले यांच्या अन्यायकारक व तुच्छतेच्या वागणुकीला कंटाळून आपण निजामपूर विभागासह महाड विधानसभा मतदार संघातील समर्थकांसह सोमवार, दि. २८ ऑक्टोबर रोजी महाड येथे महाड विधानसभा मतदार संघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार स्नेहल माणिकराव जगताप यांचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी आपल्या समर्थकांसह उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती निजामपूर विभागातील भाले गावचे सुपुत्र चंद्रशेखर उर्फ बाबूशेठ खानविलकर यांनी निजामपूर गवळी हॉल याठिकाणी मंगळवार, दि. २२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना दिली. बाबूशेठ खानविलकर व सहकारी यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे निजामपूर विभागासह महाड मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला खिंडार पडून खा. सुनील तटकरे यांना एकप्रकारे धक्का देणाराच हा निर्णय असल्याची जोरदार चर्चा माणगाव, महाड, पोलादपूर तालुक्यासह संबंध जिल्ह्यात सुरु आहे.

या पत्रकार परिषदेला माणगाव पंचायत समितीचे माजी उपसभापती तुकाराम सुतार, प्रसाद गुरव, निजामपूर विभाग राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संदीप जाधव, सचिव किरण पागार, मिलिंद फोंडके, पाणसई विभाग राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष भिकूशेठ धाडवे, राष्ट्रवादीचे निजामपूर शहराध्यक्ष महेश शिर्के, घनशाम तटकरे, शरद सावंत, दत्ताराम खांबे, बाबू पोळेकर, किशोर तोंडलेकर यांच्यासह मतदार संघातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना बाबूशेठ खानविलकर पुढे म्हणाले की, मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महाड विधानसभा मतदार संघाचा गेली चार वर्ष अध्यक्ष म्हणून काम केले. या पदाचा राजीनामा नुकताच मी पक्षाचे जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गट हा महायुतीतील एक घटक पक्ष आहे. या महायुतीचे महाड विधानसभा मतदार संघाचे उमेदवार म्हणून शिवसेना शिंदे गटाचे आ. भरत गोगावले यांच्या नावाची घोषणा झाली असून ते महाड मतदार संघातून निवडणूक लढविणार आहेत. त्यामुळे आ. गोगावले यांनी गेली दीड वर्ष आम्हाला दिलेल्या अन्यायकारक व तुच्छतेच्या वागणुकीला कंटाळून आम्ही सारी मंडळी दि. २८ ऑक्टोबर रोजी महाड येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षात प्रवेश करणार आहोत.
२०१५ मध्ये माझी निजामपूर विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्यानंतर चार वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाड विधानसभा मतदार संघाच्या अध्यक्षपदी निवड झाली. हि जबाबदारी आपण माझ्या सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन समर्थपणे सांभाळली. पक्ष श्रेष्ठींनी जे-जे आदेश दिले त्याचे पालन करून महाड विधानसभा मतदार संघात पक्ष संघटना मजबूत करण्याचा प्रयत्न केला. पत्रकारांनी खानविलकर यांना सहा वर्ष तुम्हाला राष्ट्रवादी पक्षातून निलंबित करण्यात आल्याबाबतचा पत्र व्हायरल होत असल्याचा प्रश्न विचारला असता या प्रश्नाला उत्तर देताना खानविलकर म्हणाले, मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाचा राजीनामा दिला असल्याने माझे निलंबन होणे साहजिक असून याबाबत माझी कोणतीही तक्रार नाही. खा. सुनील तटकरेंबाबत आपली कोणती निराशा आहे का? पत्रकारांनी विचारलेल्या या प्रश्नाला उत्तर देताना खानविलकर म्हणाले कि, आमच्या तनात, मनात, हृदयात तटकरे साहेब आजही आहेत, उद्याही व भविष्यातही राहतील. केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीत समाविष्ठ झाल्यामुळे आम्हाला भरत गोगावले यांचे काम करावे लागणार असल्याने आम्ही हा पक्ष प्रवेशाचा निर्णय माझ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन घेतला आहे.
आपल्या सोबत मतदार संघातील आणखी कोण-कोण राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी प्रवेश करणार? पत्रकारांनी विचारलेल्या या प्रश्नाला उत्तर देताना खानविलकर म्हणाले, माझे निजामपूर विभागासह गोरेगाव तसेच महाड, पोलादपूर तालुक्यातील सहकारी, पदाधिकारी व कार्यकर्ते, मतदार संघातील सरपंच, उपसरपंच, अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्यासह माझे सहकारी प्रसाद गुरव, महाड मतदार संघातील ज्येष्ठ नेते चंद्रकांत जाधव व त्यांचे सहकारी व डॉ. इरफान अंतुले व त्यांचे सहकारी असे बहुसंख्य कार्यकर्ते प्रवेश करणार आहेत. आपल्या या प्रवेशाबाबत खा. सुनील तटकरेंची ही चाल असावी अशी चर्चा मतदार संघात सुरु आहे? असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केल्यावर या प्रश्नाला उत्तर देताना खानविलकर म्हणाले, तटकरे साहेब युती धर्माशी प्रामाणिक आहेत. त्यांनी मला समजवण्याचा व थांबवण्याचा अनेकदा प्रयत्न केला. मात्र दीड वर्षात आ. गोगावले यांनी मला व माझ्या कार्यकर्त्यांना भरपूर त्रास दिला असल्याने आमच्या कोणत्याही कार्यकर्त्यांची गोगावले यांचे काम करण्याची मानसिकता नाही. खा. सुनील तटकरे साहेबांना आम्ही सोडून जात असल्याने जेवढे दुःख होत असेल तेवढे दुःख त्यांना सोडताना आम्हालाही होत असल्याची जाणीव आमच्या मनात असल्याचेही खानविलकर म्हणाले.