• Tue. Jun 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

श्रीवर्धन रुग्णालयाच्या प्रभारी डॉक्टरकडे म्हसळा ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी पद

ByEditor

Nov 22, 2024

म्हसळा विंचूदंश प्रकरणी प्रशासकीय कारवाईचा बनाव?

दिघी : म्हसळा ग्रामीण रुग्णालयात झालेल्या विंचूदंश प्रकरणात सध्या तपास संथगतीने सुरु आहे. त्यामुळे आम्हाला न्याय कधी मिळणार असा प्रश्न मुलगा गमावलेल्या वडिलांनी केला आहे. या घटनेवरून शासकीय रुग्णालयात काम करत असताना खाजगीत होणारी डॉक्टरांची प्रॅक्टिस चर्चेत येऊ लागली आहे. तर श्रीवर्धन रुग्णालयाच्या प्रभारी वैद्यकीय अधीक्षक यांचेकडे म्हसळा ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारीपद दिल्याने नक्की कुणाला वाचवण्याचे प्रयत्न सुरु आहेत अशा संशय येऊ लागलाय.

१२ नोव्हेंबर रोजी म्हसळा येथील ग्रामीण रुग्णालयात विंचुदंशाने मृत झालेल्या ४ वर्षीय मिहिर मनोहर कांबळे या बालकाचा मृत्यू झाला होता. डॉ मेहता यांनी रुग्णाला तपासण्यासाठी ५ तास उशीर केला आणि मिहिरची प्रकृती अत्यवस्थ झाल्यावर पुढे पाठवून दिले असा आरोप मृत बालकाचे वडील करत आहेत. तशी त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केलेली आहे. सदर प्रकरणामध्ये पोलिस प्रशासन अतिशय संथ गतीने तपास करत असून आरोग्य विभाग डॉक्टरांना वाचवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे, परिणामी “आम्ही दोघे भाऊ भाऊ” अशीच काहीशी परिस्थिती या दोन्ही विभागांची झाली आहे. तसेच डॉ. मेहता यांचे अजूनही निलंबन झालेले नसून त्यांना माणगाव येथे कामावर रुजू करून घेण्यात आल्याने जिल्हा शल्य चिकित्सक आणि डॉ. मेहता यांनी मिळून “ मी मारल्याचे नाटक करतो तू रडण्याचे कर“ अशी परिस्थिती बनवली आहे.

घटनेच्या दिवशी डॉ. मेहता सुट्टीवर होते असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने यांनी सांगितले व सध्या त्यांना माणगावला ड्यूटीसाठी हजर करून घेतले असून त्यांना निलंबित केलेले नाही. मात्र जर डॉ मेहता सुट्टीवर होते तर मग शवविच्छेदन म्हसळ्यात करण्यासाठी दबाव का आणत होते? याशिवाय त्यांनी त्यांची रजा कधी आणि कोणाच्या सहीने मंजूर करून घेतली होती हे प्रश्नही उपस्थित होत आहेत. प्रकरण शांत झाल्यावर कागदपत्रांमध्ये फेरफार करून रजेवर असल्याचा हा बनाव असून डॉ मेहता आणि सिविल सर्जन दोघांचीही चौकशी व्हावी ही मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे. प्राथमिक उपचार देणाऱ्या डॉ पवन यादव यांनी सुद्धा बालकाला काय काय उपचार दिले, खरच दिले की फक्त कागदावरच उपचार दिल्याचे दाखवले याची सुद्धा चौकशी करण्याची मागणी नातेवाईक करत आहेत. मंत्री अदिती तटकरे यांनी आम्हा गरिबांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी मनोहर कांबळे यांनी केली आहे.

घटनेच्या दिवशी मी स्वतः सुद्धा ड्यूटीवर होतो. डॉ. मेहता सकाळी ग्रामीण रुग्णालय म्हसळा येथे नेहमीसारखे रुग्णभेटीला आले होते. विंचुदंशनंतर माझ्या मुलाला ग्रामीण रुग्णलयात आणल्यानंतर डॉ. मेहतांना अनेक वेळा बोलावून सुद्धा ते आले नाहीत, म्हणून त्यांना बोलवायला मी त्यांच्या खासगी हॉस्पिटलमध्ये गेलो असता प्रशासकीय कागदपत्रांवर सुद्धा त्यांनी त्या दिवशी सह्या केल्या. विश्वजीत या लिपिकाकडे चौकशी केली असता त्याने डॉ. मेहता सुट्टीवर नसल्याचे मला आणि सोबतच्या गावकऱ्यांना सांगितले आहे.
-मनोहर कांबळे
मृत मुलाचे वडील व ग्रामीण रुग्णालयातील सिक्युरिटी गार्ड

घटनेच्या दिवशी डॉ. मेहता हे सुट्टीवर होते. गुन्हा दाखल असल्याने पोलीस तपास सुरु आहे, तसेच शवविच्छेदन अहवाल प्रतीक्षेत आहे. सदर घटनेच्या तपासासाठी आम्ही चौकशी समिती गठीत केली आहे.
-डॉ. अंबादास देवमाने
जिल्हा शल्यचिकित्सक, अलिबाग.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!