विश्वास निकम
कोलाड : संपूर्ण महाराष्ट्रासह रायगड जिल्ह्यात बुधवारी झालेल्या सात विधानसभा मतदारसंघात निवडणूक शांततेत पार पडली असुन आता शनिवार, दि. २३ नोव्हेंबर रोजी जाहीर होणाऱ्या निकालाची प्रतीक्षा असली तरी या निवडणुकीत कोण निवडून येणार?, कोणाचा पत्ता कट होणार? अशी चर्चा प्रत्येक चहा टपरी, हॉटेल, किराणा दुकान तसेच पान टपरीवर बसून लोकांमध्ये सुरु असुन तर्कवितर्क काढण्यात लोक गुंतले आहेत.
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने मिळविलेल्या यशामुळे विधानसभा निवडणूक हि अटीतटीची होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार महायुती सत्तेत येईल अशा अंदाज असला तरी कोकणात निवडून येणाऱ्या उमेदवारांवर महायुती व महाविकास आघाडी यांचे भवितव्य अवलंबून असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
रायगडमध्ये ७ विधानसभा मतदानसंघ असुन रायगड जिल्ह्यातील बहुतेक मतदान संघात तिरंगी लढत असल्याचे पहावायस मिळाले असुन या सर्व मतदार संघातील लढत या अटीतटीच्या होणार असल्याचा अंदाज जाणकरांकडून व्यक्त केला जात असुन निवडून येणारा उमेदवार हा अल्पमताने निवडून येणार असल्याचे बोलले जात आहे.
रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन मतदार संघातील राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार अदिती तटकरे यांच्या विजयाचे बॅनर निकाला आधीच लावण्यात आले आहेत तर पेण, उरण, कर्जत, अलिबाग, महाड, पनवेल मतदार संघात कोणता उमेदवार विजयी होईल याची खात्री कोणच देत नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे सर्वांचे लक्ष आता शनिवारच्या निकालाकडे लागले आहे.