• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजीनामा; पुढचा मुख्यमंत्री कोण होणार?

ByEditor

Nov 26, 2024

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता पुढचा मुख्यमंत्री कोण होणार या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्रिपदाबाबत अजून स्पष्टता आली नसली तरी भाजपचे वरिष्ठ नेते या बाबत लवकरच निर्णय घेण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी राजभावनात पोहोचले असून शिंदे यांनी त्यांचा राजीनामा राज्यपाल यांना सोपवला आहे. दरम्यान, शिंदे यांच्या एका पोस्टमुळे चरनचांना उधाण आले आहे. शिंदे यांनी आपल्या समर्थकांना निवासस्थानाबाहेर जल्लोष करू नये, असे आवाहन केले आहे. महायुतीच्या विजयानंतर फडणवीस मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, शिवसेनेकडूनही शिंदे यांचे नाव पुढे केले जात आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना भेटून मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. राज्यपालांनी हा राजीनामा स्वीकारून नवीन मुख्यमंत्र्यांची नियुक्ती होईपर्यंत शिंदे यांची काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करत असल्याचे पत्र त्यांना सुपूर्द केले. यावेळी देवेंद्र फडणवीस, अजित पवार, दीपक केसरकर, दादाजी भुसे आणि चंद्रकांत रघुवंशी हेदेखील उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा जो निर्णय देतील तो मान्य राहील असे एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय झाला. या मोठ्या विजयानंतर राज्यात पुन्हा एकदा आमचे सरकार स्थापन होईल, असे एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं. महाआघाडी म्हणून आम्ही एकत्र निवडणूक लढवली आणि आजही सोबत आहोत. त्यामुळे त्यांच्या समर्थनार्थ वर्षाबांगल्या बाहेर किंवा इतर कोणत्याही ठिकाणी एकत्र येऊ नये, असे आवाहन शिंदे यांनी केले होते. त्यामुळे ते पदाचा राजीनामा देणार अशी चर्चा होती. अखेर त्यांनी त्यांचा राजीनामा राज्यपालांना दिला आहे. शनिवारी, २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर झाल्यानंतर महायुतीला २८८ पैकी २३० जागा जिंकून सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला. यात भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक १३२ जागा मिळाल्या. यामुळे भाजप हा मोठा पक्ष ठरला आहे. तर, शिवसेनेला ५७ तर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला ४१ जागा मिळाल्या आहेत.

फडणवीस सोमवारी रात्री उशिरा पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीसाठी दिल्लीत गेले होते. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची कन्या अंजली हिच्या लग्नानिमित्त फडणवीस हे दिल्लीला गेले होते. यावेळी फडणवीस यांच्यासोबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर देखील उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेऊन महाराष्ट्रात सरकार स्थापनेबाबत चर्चा करण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्रिपदाबाबत विविध तर्क वर्तवले जात आहेत. भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्याने मुख्यमंत्री पद भाजपला मिळावे असे भाजप नेत्यांची मागणी आहे. तर ही निवडणूक एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढवल्याने त्यांना मुख्यमंत्री करावे असे शिंदे यांच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. मात्र, भाजपलाच मुख्यमंत्रीपद मिळणार असल्याने एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा होती. दरम्यान, त्यांनी आता राजीनामा दिल्याने लवकच मुख्यमंत्री पदाबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!