वृत्तसंस्था
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मुख्यमंत्रीपदावरून गोंधळ सुरू आहे. विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून पाच दिवस झाले असले तरी महायुतीचे सरकार अद्याप स्थापन झालेले नाही. मुख्यमंत्रीपदासाठी सुरू असलेल्या रस्सीखेचीत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची चर्चा आहे. या संदर्भात भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
चंद्रकांत पाटील यांनी केलेलं विधानं
चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधताना पक्षश्रेष्ठींच्या निर्णय प्रक्रियेवर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, “भाजप नेहमीच नवीन नेतृत्व शोधण्यावर भर देतो आणि त्यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवते. राजस्थान आणि मध्यप्रदेशसारख्या राज्यांमध्ये भाजपने नवीन प्रयोग राबवले. मात्र, महाराष्ट्रात असे प्रयोग होणार का, याबाबत मी काही सांगू शकत नाही.”
ते पुढे म्हणाले,”निवडणूक निकालांवर सखोल चर्चा होत असून पक्षाच्या केंद्रीय समितीत विविध विषयांवर निर्णय घेतले जातात. आमचे नेते कोणाला मंत्रीपद द्यायचे, यावर योग्य वेळी निर्णय घेतील.”
ईव्हीएम आणि विरोधकांवरील टीका
ईव्हीएम बाबत विरोधकांकडून सातत्याने आरोप होत आहेत. याबाबत चंद्रकांत पाटील म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयाने ईव्हीएमसंदर्भात आपले स्पष्ट मत नोंदवले आहे आणि सर्व आरोप फेटाळले आहेत. विरोधकांनी केवळ आरोप न करता ते सिद्ध करावे.”
पक्षाची केंद्रीय समिती असून त्यात विविध विषय चर्चा होऊन त्यात वेगवेगळ्या जबाबदारी वाटप करण्यात येईल. आमचे नेते कोणाला मंत्री पद द्यायचे याबाबत निर्णय घेतील. भाजपचे महिला आमदार आणि मंत्री भाजप यांचे अधिक आहे. पक्ष देईल ती जबाबदारी मी पार पाडतो, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
महाराष्ट्रातील मुख्यमंत्रीपदाचा तिढा अद्याप सुटलेला नसून, भाजपच्या निर्णय प्रक्रियेवर सर्वांचे लक्ष आहे. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यांमुळे राजकीय चर्चांना वेग आला आहे. फडणवीस मुख्यमंत्री होतील का, की भाजप एखादा नवीन चेहरा पुढे करेल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.