महिला प्रवाशांनी सावधगिरी बाळगावी
अनंत नारंगीकर
उरण : बोकडविरा ग्रामपंचायत हद्दीतील द्रोणागिरी रेल्वे स्टेशनमधून अनेक प्रवासी नागरिक, नोकरदार, विद्यार्थी तसेच काही कामानिमित्त नवीमुंबई शहराकडे जाणाऱ्या महिला या प्रवास करत आहेत. द्रोणागिरी रेल्वे स्टेशन परिसरात, रस्त्यावर वाढलेल्या गवताचा फायदा उठवत भामटे (चोरटे) हे स्टेशनवरून आपल्या घराकडे जाणाऱ्या महिलांच्या अंगावरील दागिने हिसकावून पोबारा करत आहेत. तरी प्रवाशी नागरिकांनी विशेष करून महिलांनी घाबरून न जाता सतर्कता बाळगणे गरजेचे आहे.
मुंबई व नवीमुंबई शहराला जोडणारी उरण रेल्वे सेवा ही २०२४ मध्ये सुरू झाल्याने त्याचा फायदा हा उरणच्या जनतेला, नोकरदार, विद्यार्थी, चाकरमानी, प्रवाशी नागरिकांना मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र, रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे द्रोणागिरी रेल्वे स्टेशन परिसरात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गवताचे साम्राज्य पसरले असल्याने त्यांचा त्रास हा प्रवाशी नागरिकांना सहन करावा लागत आहे. द्रोणागिरी रेल्वे स्टेशन परिसरात, रस्त्यावर वाढलेल्या गवताचा फायदा उठवत भामटे (चोरटे) हे स्टेशनवरून आपल्या घराकडे जाणाऱ्या महिलांच्या अंगावरील दागिने हिसकावून पोबारा करत असल्याचे महिलांकडून सांगण्यात येत आहे. तरी रेल्वे व सिडको प्रशासनाने खबरदारी म्हणून रेल्वे स्टेशन परिसरात, रस्त्यावर वाढलेले गवत काढण्यासाठी पुढाकार घ्यावा. तसेच रेल्वे पोलिस तैनात करण्यात यावेत अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
द्रोणागिरी रेल्वे स्टेशन परिसरात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे. त्याचा व अंधाराचा फायदा उठवत काही भामटे (चोरटे) हे प्रवाशी महिलांच्या अंगावरील दागिने घेऊन पोबारा करत असल्याच्या घटना समोर येत आहेत. यासंदर्भात भयभीत अवस्थेतील महिला या सदर घटनेची तक्रार दाखल करण्यासाठी पुढे येत नाहीत. तरी रेल्वे पोलीस यंत्रणेने महिलांच्या सुरक्षेसाठी सतर्कता बाळगणे आवश्यक असून सिडको व रेल्वे प्रशासनाने परिसरातील व रस्त्यावरील वाढलेले गवत काढण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे.
-जगदीश भोईर,
सामाजिक कार्यकर्ते बोकडविरा-द्रोणागिरी नोड.