• Sun. Jun 29th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मुंबई-गोवा महामार्गावरील महिसदरा नदीवरील नवीन पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे

ByEditor

Dec 9, 2024

ठेकेदाराविरुद्ध ग्रामस्थ आक्रमक

विश्वास निकम
कोलाड :
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ वरील कोलाड, पुई या गावानजिक महिसदरा नदीवर पुलाचे काम अनेक वर्षांपासून रखडले आहे. या कामाला १७ वर्षे पूर्ण झाली असून या कामात कोणतीही प्रगती नाही असेच दिसून येते. मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर हे काम वेगात सुरु असुन हे काम मे २०२५ पर्यंत पूर्ण करण्याच्या इराद्याने सुरु असुन काम पूर्ण करण्यासाठी संबंधित ठेकेदारांनी मनमानी सुरु केली असल्याचे दिसून येत आहे. हे काम रात्रीच्या वेळी सुरु असुन सदर काम हे निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे.

मुंबई गोवा महामार्गांवरील पुई येथील महिसदरा नदीवरील पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी ठेकेदाराला घाई झाल्याचे दिसून येत आहे. हे काम संध्याकाळी ५ ते रात्री ११-१२ दरम्यान सुरु असल्याचे दिसून येत असल्यामुळे या पुलाचे काम घाईगडबडीत सुरु असल्यामुळे हे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. हि बाब येथील ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर या कामाच्या ठिकाणी जाऊन ग्रामस्थांनी या कामाची पाहणी केली. यावेळी संभाजी ब्रिगेड रायगड जिल्हा उपाध्यक्ष सिद्धार्थ गायकवाड, अशोक धामणसे, आत्माराम दिवेकर ,सखाराम सावंत, तसेच पुई ग्रामस्थ यांनी पुई गावाजवळ महीसदरा पुलाच्या बाजूला जाऊन पाहणी केली असता महामार्गावरील पहिली टाकलेली डांबर खोदकाम न करता त्यावर मलमपट्टी करून सिमेंट काम सुरु केले आहे. याबाबत विचारणा केली असता येथील कामगार म्हणतात आम्हाला काहीच माहिती नाही, आम्हाला फक्त जुना रोड साफ करून साईडपट्ट्या मारून ठेवायला सांगितले आहे.

सदर बाब ग्रामस्थांनी रोहा तहसीलदार यांना दूरध्वनीवरून संदेश देऊन त्यांच्या निदर्शनास आणली असता रोहा तहसीलदार यांनी उद्या सकाळी १० वाजता ग्रामस्थांना भेट घेण्यास सांगितले. संभाजी ब्रिगेडचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष सिद्धार्थ गायकवाड व त्यांचे कार्यकर्ते उद्या सकाळी १० वाजता तहसीलदार यांना भेटणार असुन यानंतर हे काम असेच सुरु राहिले तर संभाजी ब्रिगेड योग्य ती कारवाई करेल असे सिद्धार्थ गायकवाड यांनी पत्रकारांशी बोलातांना सांगितले.

यावेळी सिद्धार्थ गायकवाड यांनी सांगितले की, नवीन पुलाच्या बाजूला असलेल्या जुन्या पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. जीर्ण झालेला पुलाला बाहेरून प्लास्टर करून नवीन केला आहे. यामुळे हा पूल किती दिवस तग धरेल हे सांगता येत नाही. या पुलावरून एखादे अवजड वाहन गेले तर हा पूल पूर्णपणे हादरतो, यामुळे जणू प्रवाश्यांच्या जीवाशी खेळ मांडला असुन यामुळे मोठी दुर्घटना घडली व कोणाचा नाहक बळी गेला तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!