वृत्तसंस्था : राष्ट्रवादीत पवार कुटुंबाच्या मनोमिलनाचं पर्व सुरु असताना दोन तुकडे झालेल्या शिवसेनेतही एकत्रिकरणाचे वारे वाहू लागल्याचं दिसू लागलेत. शरद पवारांनी तुटलेलं नातं जोडण्यासाठी पुढाकार घेतला. तसं नातं जोडणं उद्धव ठाकरेंनी शरद पवारांकडून शिकावं असा सल्ला शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांनी दिला आहे. राष्ट्रवादीत दोन्ही बाजुने टाळी वाजत आहे. तसं शिवसेनेतही कुणीतरी टाळी द्यायला तयार हवं असं मत संजय शिरसाट यांनी व्यक्त केलं आहे. संजय शिरसाट आणि शिवसेना एकप्रकारे उद्धव ठाकरेंना सिग्नल देत आहे काय़ अशी चर्चा सुरु झाली आहे. दोन्ही शिवसेना कटुता विसरुन एकत्र येतील का असा प्रश्न शिवसैनिक आपापसात विचारु लागले आहेत.
संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?
“ते एकत्र आले तर आम्ही अभिनंदन करु. आम्हाला काय प्रॉब्लेम आहे. आम्ही भांडणं लावणारे नाही तर जोडणारे लोक आहोत. नातं जोडणं हे शरद पवारांकडून शिकावं,” असं संजय शिरसाट म्हणाले आहेत. तुमच्यात तसं काही व्हावं असं वाटत नाही का? असं विचारलं असता ते म्हणाले, “आम्हाला वाटून काय उपयोग आहे. दोन्ही हातांनी टाळी वाजणं गरजेचं आहे. त्यांच्या टाळ्याही वाजतात आणि गळ्यात हारही घालतात. आमचं सोडून द्या, पण ते एकत्र आले तर आम्हाला आनंद आहे”.
शिरसाट यांच्या वक्तव्यावर सचिन अहिर यांची प्रतिक्रिया
“आमचे हात कापायला निघालेले आणि टाळीचा विचार करत आहेत. संकुचित विचार करुन राजकारण होत नाही. संस्कृती, नाती जपावी लागतात. सर्व नाती तोडून पाठीत खंजीर खुपसून जाणाऱ्यांसंबंधी भावना, विचार करणं योग्य नाही. लोकप्रतिनिधी या नात्याने सभागृहात भेटतो, एकमेकांना हाक मारतो, हस्तांदोलन करतो. ही संस्कृती आजही जिवंत ठेवण्याचं काम लोकप्रतिनिधी या नात्याने केलं आहे. पण पूर्ण पक्ष, नाव, चिन्ह घेण्याचं काम ज्या पद्धतीने केलं त्याबद्दल चिड आहे,” अशी प्रतिक्रिया सचिन अहिर यांनी दिली आहे.