मुंबई: महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार आणि नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा उद्या (रविवारी) नागपुरातील राजभवनात होणार आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. अनेक नेते पक्षश्रेष्ठींच्या गाठी-भेटी घेताना दिसत आहेत. मुंबईतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर आज सकाळपासून चांगलीच वर्दळ वाढल्याचे दिसून येत आहे.
राज्य मंत्रिमंडळ विस्ताराआधी भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार देवेंद्र फडणवीसांच्या घरी पोहचत असताना याचदरम्यान मनसेचे माजी आमदार राजू पाटील देखील सागर बंगल्यावर पोहचले. आज सकाळी राजू पाटील यांची गाडी सागर बंगल्यावर आल्याने राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा रंगू लागली. मात्र मुलाच्या लग्नाची पत्रिक देण्यासाठी राजू पाटील सागरवर देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला दाखल झाले होते. राजू पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांना मुलाच्या लग्नाचे आमंत्रण दिले.