विश्वास निकम
कोलाड : मुंबई गोवा महामार्ग ६६ वरील चौपदरीकरणाचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. परंतु या चौपदरीकरणासाठी वापरण्यात येणारी माती, सिमेंट, खडी रस्त्यावर पडत असल्यामुळे या महामार्गावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. खांब, पुई, कोलाड बाजारपेठ ते तळवली, रातवड या ठिकाणी रस्त्याचे काम सुरु असल्यामुळे येथे प्रचंड धूळ पसरत आहे. या धुळीमुळे वाहनचालकांसह प्रवाशी वर्ग व रहिवाशी नागरिक यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर धुळीचा त्रास होऊ नये म्हणून रस्त्याला पाण्याची फवारणी केली जात आहे. परंतु या फवारणीमुळे रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण होत आहे. या चिखलातून मार्ग काढतांना दुचाकी वाहने घसरून अपघात घडत आहेत. यामुळे असंख्य प्रवाशी जखमी होत आहेत, तर अनेकांचा नाहक बळी जात आहे. यामुळे याला जबादार कोण? असा प्रश्न प्रवाशी वर्गातून केला जात आहे.
मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १७ वर्षांपासून सुरु आहे. परंतु विधानसभा निवडणुकीनंतर हे काम युद्ध पातळीवर सुरु असले तरी या कामात कोणतेही नियोजन दिसून येत नाही. मुंबई-गोवा महामार्गावरील सुकेळी खिंड, खांब, पुगांव, पुई, कोलाड बाजारपेठ, वरसगांव, तळवली ते रातवड या ठिकाणी रस्ता काँक्रिटिकरण, उड्डाणपूल, छोटे मोठे ब्रिज, गटार, बायपास रस्त्याचे काम सुरु आहे. परंतु ‘शासनाचे काम बारा महिने थांब’ या म्हणीप्रमाणे सुरु आहे यामुळे या महामार्गाचे काम केव्हा पूर्ण होईल याची खात्री देता येत नाही.
कोलाड बाजारपेठेत तसेच तळवली, पुई, खांब येथील महामार्गवरील रस्त्यावर प्रचंड धुळीचे साम्राज्य पसरले आहे. या धुळीमुळे वाहचालकांसहित, प्रवाशी वर्ग, व्यापारी तसेच रहिवाशी नागरिक बेजार झाले आहेत. वेगाने ये-जा करणाऱ्या वाहनांमुळे रस्त्यावरील धूळ व्यावसायिकांच्या दुकानात जाऊन मोठे नुकसान होत आहे. याला पर्याय म्हणून रस्त्यावर पाणी मारले जात आहे. परंतु या पाण्यामुळे रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण होत आहे, तर दोन तासांनी परिस्थिती जैसे थे अशीच होते. यामुळे दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे.
मुंबई-गोवा महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे या महामार्गावर दररोज अपघात होत असुन यामुळे असंख्य नागरिकांचा नाहक बळी जात आहे. शिवाय रस्त्यावर पसरत असलेल्या धुळीमुळे समोरील रस्ता दिसेनासा होतो. यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. शिवाय या धुळीमुळे सर्दी, दमा, खोकला, घशाचे आजार, डोळ्यांच्या आजारांनी डोके वर काढले आहे. यामुळे लोकांना होणारा त्रास दूर करण्यासाठी महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी प्रवाशी वर्गातून करण्यात येत आहे.