नाशिक : महायुतीच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा पत्ता कट केल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यात नाराज भुजबळांना थेट कसला वादा अन् कसला दादा असे म्हणत थेट पक्षश्रेष्ठींवरचं हल्लाबोल केला आहे. एवढेच नव्हे तर, जहाँ नहीं चैना वहाँ नहीं रहेना असे म्हणत भुजबळांनी एखप्रकारे बंडाचे संकेत दिले असून, भुजबळ त्यांच्या नव्या राजकीय इनिंगची सुरूवात भाजपमध्ये प्रवेश करून करण्याची दाट शक्यता आहे.
काल (दि.17) माध्यमांशी संवाद साधताना भुजबळांनी त्यांच्या मनातील सर्व भावना बोलून दाखवल्या. ते म्हणाले की, मंत्रिपदाचा प्रश्न नाही अवहेलना झाली. पद कुणी नाकारलं हे शोधावं लागेल. माझ्या मंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस आग्रही होते. छगन भुजबळ यांच्या या वक्तव्यामुळे ते भाजप आणि देवेंद्र फडणवीसांच्या अधिक जवळ गेल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे ते आगामी काळात भाजपच्या गोटात दाखल होऊन महाराष्ट्र किंवा दिल्लीत कुठेही काम करु शकतात, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
“जहाँ नहीं चैना वहा नहीं रहना”, असं सूचक वक्तव्य छगन भुजबळ यांनी केले आहे. आता छगन भुजबळांची नाराजी दूर करण्यासाठी राष्ट्रवादीकडून प्रयत्न केले जात आहेत. राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल हे तिघे लवकरच छगन भुजबळांची भेट घेणार आहेत. छगन भुजबळ यांची नाराजी दूर करण्यासाठी हे तिन्ही नेते भेट घेणार आहेत. या भेटीची तारीख अद्याप निश्चित झालेली नहाी. मात्र ही भेट नाशिकमध्ये होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.