• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

बोर्लीपंचतनमध्ये कचरा रस्त्यांसह नदी-नाल्यात!

ByEditor

Dec 24, 2024

ग्रामपंचायतीचा कारवाईकडे कानाडोळा; स्वच्छतेविषयी स्थानिकांचा बेजबाबदारपणा

नदी नाल्यांसह रहदारीच्या रस्त्यांवर कचऱ्यामुळे विद्रुपीकरण

गणेश प्रभाळे
दिघी :
श्रीवर्धन तालुक्यातील सर्वात मोठ्या लोकसंख्येने असणाऱ्या बोर्लीपंचतन ग्रामपंचायतकडे कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी डम्पिंग ग्राऊंडची सोय नाही. त्यामुळे येथील रहदारीच्या रस्त्यांसह नदी, नाले डम्पिंग ग्राऊंड बनले आहेत. या अस्वच्छतेमुळे जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे.

बोर्लीपंचतन गावाच्या प्रवेशाजवळ असलेल्या नदी पात्रात व परिसरात स्थानिक गेल्या अनेक वर्षांपासून कचरा टाकतात. या परिसराला कचराभूमीचे स्वरूप आले आहे. स्वछतेचा संदेश देणाऱ्या ग्रामपंचायतचे या कचऱ्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते आहे. विशेष म्हणजे कचरा टाकणाऱ्याला कारवाईची भीतीच नसल्याने येथे कचरा टाकला जात आहे.

बोर्लीपंचतन ही तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. ग्रामपंचायतीमार्फत घंटा गाडी गावात आहे. मात्र, एका गाडीवरती संपूर्ण शहरातील कचऱ्याचा बोझा असल्याने गाडी निघून गेल्यास स्थानिक ग्रामस्थ व व्यावसायिकांकडून कचऱ्याचे वर्गीकरण न करता प्लास्टिकसह सुका व ओला कचरा थेट नदीपात्र परिसरात टाकला जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रकार राजरोस सुरू आहे. या कचराभूमीमुळे नदीला मोठा धोका पोहोचत आहे. तसेच हा कचरा नदीपात्र परिसरात टाकल्यामुळे पावसाळ्यादरम्यान नदीचे पाणी वाढले की, तो नदीच्या प्रवाहासह नदीच्या पाण्यात वाहून सर्वत्र पसरत आहे. त्यामुळे नदीचे पाणीच नव्हे तर नदी काठावर दोन्ही बाजूला असलेल्या शेतीवर त्याचा परिणाम जाणवत आहे.

सद्यस्थितीत नदीपात्राचे विद्रुपीकरण होत आहे. याशिवाय शहरात देखील अस्वच्छता दिसत आहे. कचऱ्यामुळे दुर्गंधी येत असून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. अनेक पर्यावरणप्रेमी तसेच नागरिकांकडून या समस्या मांडल्या जातात. मात्र, सत्ताधाऱ्यांनी या समस्या वेळेत न सोडवल्यामुळे सध्याच्या प्रशासक राजवटीत डोकेदुखी ठरत आहेत.

गावाचा विकास खुंटला

सद्या ग्रामपंचायतीचा कारभार प्रशासक सांभाळत आहे. मात्र, गेली कित्येक वर्ष कारभार पाहणाऱ्या पदाधिकाऱ्यांसह प्रशासनाकडून गावातील मूलभूत विकास झालाच नाही. त्यामुळे येथील अंतर्गत रस्ते, मुबलक पाणी तसेच डम्पिंग ग्राऊंडसारख्या अनेक समस्या गंभीर बनल्या आहेत.

सध्या आम्ही कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईसाठी तरतूद केली आहे. त्यासाठी जागोजागी सूचना फलक लावण्यात येतील. त्यानुसार कारवाई करण्यासाठी आम्ही लवकरच प्रयत्नशील आहोत.
-शंकर मयेकर,
ग्रामसेवक, बोर्लीपचतन

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!