प्रवासाठी वापरल्या जाणार्या बोटी व इतर साहित्य हे मुदतबाह्य
घारापुरी येथील जागतिक लेण्यांचे दर्शन घेण्यासाठी महाशिवरात्री निमित्त लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात. त्यावेळी कोणतीही सुरक्षितता न घेता खासगी मच्छीमार बोटीमधून वाहतूक केली जाते. विशेष म्हणजे त्यावेळी सर्व शासकीय यंत्रणेच्या उपस्थितीत हा सर्व प्रकार सुरू असतो. यावेळीही बुधवार, दि. 26 फेब्रुवारी 2025 रोजी महाशिवरात्री निमित्ताने घारापुरी येथे लाखोंच्या संख्येने भाविक जागतिक लेण्यांचे दर्शन घेण्यासाठी येतील. त्यावेळी योग्यती खबरदारी घेऊन प्रवासी बोटीतूनच वाहतूक करून लाईफ जॅकेटची सक्ती करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. |
घनःश्याम कडू
उरण : घारापुरी ते गेटवे प्रवाशी बोटीला बुधवार, दि. 18 डिसेंबर रोजी झालेल्या भीषण दुर्घटनेत 15 प्रवाशांना जलसमाधी मिळाली. या भीषण दुर्घटनेनंतर शासकीय यंत्रणा खडबडून जागी होत त्यांनी सुरक्षा व्यवस्था कडक करण्याच्या सूचना दिल्या आहेत. गेली अनेक वर्षांपासून सुरक्षिततेच्या नावाखाली बोट मालक व अधिकारी वर्ग या मिलिजुळी जोडीने प्रवाशांच्या जीवाशी खेळत आपले उखळ पांढरे केले त्याची चौकशी करण्याचे सोडून त्यांची पाठराखण केली आहे. मात्र या दुर्घटनेनंतर प्रवाशी वाहतूक बोटींची सुरक्षा तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहे. दुर्घटना घडल्यानंतर उशिरा सुचलेले शहाणपण हे नव्या नवरीचे नऊ दिवस या उक्तीप्रमाणे राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सागरी सुरक्षा बाबतचा प्रश्न अनेकदा चर्चेला येऊनही त्यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी काहीच उपाययोजना करण्यात आलेली नव्हती. परंतु बोट दुर्घटनेनंतर जलवाहतूक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्रवाशांना बोटीत बसल्यानंतर जॅकेट सोडा साधी बसण्यासाठीची व्यवस्था ही बरोबर नसल्याचे दिसते. तसेच बोटीत काही ठिकाणी माणसापेक्षा मोटारसायकल नेण्याकडे बोट मालकाचा कल असतो, त्यामध्ये मनमानी प्रमाणे जास्त पैसे मिळत असतात. एवढेच नाहीतर प्रवासातील काही बोटी या मुदतबाह्य होऊनही त्याचा वापर आजही जलप्रवासाठी केला जात आहे.
सागाच्या लाकडापासून बनविलेल्या बोटी या 15 वर्षे तग धरू शकतात. त्यानंतर खिळे किंवा अन्य धातू गंजतात. लाटांचे तडाख्यामुळे लाकडाची हानी होते. खार्या पाण्याने पत्रा सडतो. जेट्टीजवळ बोटी येताना अनेकदा जेट्टीच्या भिंतीला घर्षण होऊन लाकडाची झीज होते. त्यामुळे आयुर्मान सरले की या बोटी भंगारात काढावया लागतात. तरीही या बोटी तात्पुरती डागडुजी करून वापरल्या जातात, असे समजते. फायबरच्या बोटीचे आयुर्मान हे जास्त असते. या बोटी खासगी मालकीच्या असतात. फार तर ठराविक लोकच राहू शकतात. या बोटी खासगी समुद्र सफारीसाठी वापरल्या जातात. मात्र काही बोटी गुपचूप प्रवासी वाहतूक करतात, अशी चर्चा सुरू आहे. समुद्र ज्याठिकाणी खोल आहे, तेथूनच फायबरच्या बोटींना मार्गक्रमणा करावी लागते. कारण या बोटी खडकाला अडकल्यास लगेच फुटतात आणि बुडतातही लवकर.
अशा बोटीमध्ये लाइफ सेविंग, फायर फायटिंग अप्लायन्सेस आहेत का? बोटीतले फायर सिलिंडर, फोम सिलिंडर चालू अवस्थेत आहेत का? बोट बुडाली तर तीन चार लोक बसू शकतील, अशी बुओयंट उपकरणे आहेत का? मोठ्या बोटीमध्ये लाइफ राफ्ट आहेत का? जी लाइफ जॅकेट दिली जातात, ती सर्टिफाइड असली पाहिजेत. जॅकेट घातलेला माणूस पाण्यात पडला तर जॅकेटला लावलेले लाइट लागले पाहिजेत. याची तपासणी होते का? या सगळ्या गोष्टी बोट चालवणार्यांना माहिती असल्या पाहिजेत. बोटीत बसणार्या लोकांना याची कल्पना दिली पाहिजे. बोट चालवणार्यांना या गोष्टींची जुजबी माहिती असते आणि प्रशिक्षणाच्या नावाने बोंब असते. दर अडीच वर्षांनी बोट उचलून त्याचा तळ चेक करावा लागतो. तो होतो का? बोटीचे आयुष्य किमान 30 ते 35 वर्षे गृहीत धरले जाते. बोटीची बांधणी करतानाच जिथे निकष पाळले जात नाहीत, तिथे या सगळ्या प्रश्नांची तपासणी होणार कधी? एका बोटीत किती प्रवासी असावेत, याचे नियम असताना बोट तुडुंब भरेपर्यंत तिकीट देणार्या कंपन्यांवर कसलेही नियंत्रण ठेवले जात नाही. ही सगळी जबाबदारी मेरिटाइम बोर्डाने पार पाडली पाहिजे. मात्र, त्यांना बोटीच्या तपासणीपोटी मिळणार्या वरकमाईत जास्त रस असतो.
बोटींचा समुद्रातील मार्ग ठरलेला असतो. मात्र एखादी बोट ठरलेला मार्ग सोडून दुसर्या मार्गाने गेल्यास अपघाताची शक्यता वाढते. मार्ग सोडलेली बोट खडक असलेल्या भागात जाण्याची शक्यता असते. बोटीने मार्ग बदलल्यास विरुद्ध दिशेने येणार्या बोटीसाठीही ते धोकादायक ठरून टकरीची शक्यता वाढते. जवळपास 2 हजार बोटी समुद्रात मासेमारी करतात. दीपस्तंभागापासून एक किलोमीटर अंतरावरचा भाग हा सुरक्षित आहे. महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाकडून दरवर्षी प्रत्येक बोटींची तपासणी होते. इंजिन अन्य यंत्रे, आसनव्यवस्था, सुरक्षा उपकरणे आदींची पहाणी केल्यानंतर प्रमाणपत्र दिले जाते.
बोटींची वर्षातून एकदा कोळसा बंदर, रे रोड येथे दुरुस्ती होते. अशी माहिती गेटवे एलिफंटा जलवाहतूक सहकारी संस्थेचे अध्यक्ष किफायत मुल्ला यांनी दिली. मात्र अशी सुरक्षितता बोट मालकांकडून पाळल्या जातच नाही, फक्त एखादी दुर्घटना झाल्यानंतर काही दिवस प्रशासन कायदे दाखवितात. मग इतर दिवशी खुलेआम कायद्याचे उल्लंघन करून बोटीतून प्रवाशी वाहतूक करतात हे अधिकारी वर्गाना कसे दिसत नाही. यावरून या सर्वांची मिळबाटके खाणारे रॅकेट असल्याचा संशय आहे. बोटीमध्ये बसण्याची क्षमता असल्यापेक्षा जास्त प्रवाशी नेहमीच भरले जात आहेत. तसेच लाईफ जॅकेट हे सुद्धा कित्येक वर्षांपूर्वीचे पुराणे असतात. बसण्याची व्यवस्था कमी व खराब असते. त्यापेक्षा भयानक म्हणजे जलवाहतूक करणार्या बोटीं या मुदतबाह्य झाल्या असतानाही त्याचा वापर आजही केला जात आहे.
यासाठी अशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी बोटीत प्रवासासाठी प्रवेश केल्यानंतर आपत्कालीन प्रसंगात कोणती खबरदारी या विषयी सादरीकरण होणे आवश्यक बनले आहे. परंतु तसे केले जात नसल्यानेच अशा दुर्घटना होत असल्याचे बोलले जाते. आता तरी प्रशासनाने असलेल्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यावर यावी. अन्यथा परिस्थिती भयानक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.