नागपूर : मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन समीकरणं बघायला मिळू शकतात, अशा चर्चा आहेत. मुख्यमंत्रीपदावरून झालेली गच्छंती आणि त्यानंतर मंत्रीमंडळ विस्तारात मिळालेली कमी महत्त्वाची पदं पाहता, महायुती सरकारमध्ये एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा आहे. एकीकडे शिंदेंच्या नाराजीच्या चर्चा सुरू असताना भाजपचं ठाकरे गटासोबत सख्य वाढत असल्याची चर्चा आहे. दोनच दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली होती. मुंबईतील विविध समस्या आणि विकासकामांच्या चर्चेसाठी ही भेट घेतल्याचं सांगण्यात आलं, मात्र त्यानंतर महापालिका निवडणुकीत ठाकरे आणि भाजप एकत्र येऊ शकतात, या चर्चांनी वेग पकडला आहे. तसेच महापालिका निवडणुकीत शिंदेंसोबत भाजप काडीमोड घेऊ शकतो, अशाही चर्चा आहेत.
महापालिका निवडणुकीपूर्वी ठाकरे आणि भाजपमध्ये युती होऊ शकते, याबाबतचे संकेत स्वत: देवेंद्र फडणवीसांनी दिले आहेत. उद्धव ठाकरे आमचे शत्रू नाहीत, असं वक्तव्य फडणवीसांनी केलं आहे. तर ठाकरेंनी देखील उद्या काय होईल, हे सांगू शकत नाही, असं वक्तव्य केलं आहे. दोन्ही बाजुने सकारात्मक भूमिका घेतली जात असल्याने आगामी महापालिका निवडणुकीत ठाकरे आणि भाजप एकत्र येऊ शकतात, असं बोललं जातंय.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच नागपुरातील एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमात फडणवीसांची मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीत राज ठाकरे की उद्धव ठाकरे असा प्रश्न विचारण्यात आला, यावर फडणवीसांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे आधी आमचे मित्र होते. आता राज ठाकरे आमचे मित्र आहेत. मात्र उद्धव ठाकरे आमचे शत्रू नाहीत, असं वक्तव्य फडणवीसांनी केलं आहे. फडणवीसांनी महापालिका निवडणुकीआधी नव्या युतीचे संकेत दिल्याचं सांगितलं जातंय.
खरंतर, उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीत आक्रमक भूमिका घेतली होती. एक तर तू राहशील किंवा मी राहीन, असं आव्हान त्यांनी फडणवीसांना दिलं होतं. पण विधानसभा निकालानंतर उद्धव ठाकरेंनी मवाळ धोरण स्विकारलं आहे. काही दिवसांपूर्वी नागपुरात पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान ठाकरेंनी फडणवीसांची भेट घेतली होती. पुष्पगुच्छ देऊन त्यांचं अभिनंदन केलं होतं. यानंतर मागच्या काही दिवसांत उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे तीन वेळा फडणवीसांच्या भेटीला गेले आहेत. तसेच अलीकडे शिवसेना ठाकरे गटाचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’मधून फडणवीसांवर स्तुतीसुमनं देखील उधळली होती. या सगळ्या घडामोडी पाहता, आगामी निवडणुकीत राज्यात नवीन समीकरण बघायला मिळू शकतं, अशी चर्चा आहे.