सिल्लोड : शिवसेनेचे माजी मंत्री आणि आमदार अब्दुल सत्तार यांनी पुढील विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचं म्हटलं आहे. अंभई येथील एका कार्यक्रमात बोलताना सत्तारांनी ही घोषणा केली. त्यांच्या या घोषणेनं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आमदार आणि मंत्री असतांना मी कोट्यवधी रुपयांचा निधी आणला. पण, विरोधक काहीही न करता, त्यांना माझ्याबरोबरीने मते मिळतात. यापुढं मी सिल्लोड विधानसभा निवडणूक लढवणार नाही, असं सत्तार म्हणाले.
अलीकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सिल्लोड-सोयगाव मतदारसंघातून सत्तारांचा फक्त दोन हजार मतांनी विजय झाला. त्यानंतर राज्यात महायुतीची सत्ता आली. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात अब्दुल सत्तार यांना वगळण्यात आले. त्यानंतर आज मतदारसंघातील अंभई येथील एका कार्यक्रमात सत्तारांनी ही घोषणा केली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, मी आमदार आणि मंत्री असताना १८-१८ तास सालदार महिनदारासारखे काम केलं. सरकारी योजनेचा लाभ अनेक महिलांना आणि कामगारांना मिळवून दिला. कामगार नोंदणी करण्यासाठी यंत्रणा राबवली, सिल्लोड सोयगाव मतदारसंघ विकसित केला, सूतगिरणी, वैद्यकीय महाविद्यालय आणि एमआयडीसी आणली. शेतकरी बागायतदार व्हावा, यासाठी पूर्णी नदीवर बेरिजेस बांधण्याच्या कामाला मंजुरी दिली. पण शेवटी जातीपातीवर निवडणूक झाली आणि माझा २,४२० मतांनी विजय झाला. लोकांना विकोस नकोय. तर जातीपातीवर निवडणुका हव्यात, असं सत्तार म्हणाले.
सत्तार म्हणाले, जातीपातीवर निवडणुका होत असतील तर आगामी सिल्लोडची नगर परिषद माझी शेवटची निवडणूक राहिल. यापुढं मी सिल्लोड विधानसभा निवडणूक लढवणार नाही, असं ते म्हणाले. पुढं सत्तार म्हणाले, आमदार आणि मंत्री असतांना कोट्यवधी रुपयांचा निधी आणला. पण, विरोधक काहीही न करता, त्यांना माझ्याबरोबरीने मते मिळतात. विरोधक जातीपातीवर निवडणुका लढतात. हे राजकारण घातक आहे. जर विकासाला प्राधान्य दिले जात नसेल आणि फक्त जातीच्या आधारावर निवडणुका होत असतील तर आतापर्यंत मला निवडून दिल्याबद्दल मी जनतेचे आभार मानतो, परंतु मी आता सिल्लोड विधानसभा निवडणूक लढवणार नाही. मी माझा मुलगा, माजी नगराध्यक्ष अब्दुल समीरला सांगितले की मी निवडणूक लढवणार नाही. तुला लढायची असेल तर बघ… नाहीतर जय हिंद जय महाराष्ट्र, अशी घोषणा सत्तारांनी केली.