रायगड : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या पालकमंत्र्यांची यादी राज्य सरकारकडून शनिवारी रात्री जाहीर करण्यात आली होती. या यादीनुसार, रायगडची जबाबदारी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या अदिती तटकरे यांच्याकडे देण्यात आली होती मात्र त्यानंतर महायुतीमध्ये अनेक नेते नाराज असल्याची माहिती समोर येत आहे.
रायगडचे पालकमंत्री पद अदिती तटकरे यांच्याकडे देण्यात आल्याने शिवसेना नेते भरत गोगावले देखील नाराज झाले आहे. त्यामुळे राज्य सरकारने मोठा निर्णय घेत रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री पदाची नियुक्ती पुढील आदेशापर्यंत स्थगित केली आहे. मात्र तरीही देखील आतापर्यंत त्यांच्या अनेक समर्थकांनी पक्षातून राजीनामे दिले आहे. तर दुसरीकडे भरत गोगावलेंच्या समर्थकांनी मुंबई-गोवा महामार्ग रोखून धरला होता. तर दुसरीकडे आता या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया देत रस्त्यावर टायर पेटवणे ही आपली संस्कृती नाही, मुख्यमंत्री आल्यानंतर रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटेल. असे वक्तव्य केले आहे. ते आज रायगडमध्ये माध्यमांशी बोलत होते.
माध्यमांशी बोलताना सुनील तटकरे म्हणाले की, रायगड पालकमंत्रीच्या वादावर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री बसून निर्णय घेणार आहे. मुख्यमंत्री सध्या दाओसला गेले आहेत. तिकडे परकीय गुंतवणूक आणण्यात ते यशस्वी होतील. त्यामुळे राज्यात काही वाद निर्माण करणे उचित राहणार नाही. मुख्यमंत्री आल्यावर त्यांच्यासोबत दोन्ही उपमुख्यमंत्री बसणार आणि निर्णय घेणार असं माध्यमांशी बोलताना सुनील तटकरे म्हणाले. पुढे बोलताना सुनील तटकरे म्हणाले की, बावनकुळे भाजपचे अध्यक्ष आहेत. त्यांनी काल सांगितलं की,आम्ही सुसंस्कृत आहोत. आघाडी युतीच्या राजकारणामध्ये सर्वांच्या मनासारखे होईल असे नाही. राज्यात 237 आमदारांचं पाठबळ आहे. राज्याच्या विकासाला गती देण्याची उत्तम संधी जनतेने दिली आहे. रायगड, कोकण असेल केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून विकासाची संधी प्राप्त झाली.असं देखील ते म्हणाले.
सुनील तटकरे यांनी भरत गोगावलेंच्या समर्थकांनी महामार्गावर टायर जाळून आंदोलन केले या घटनेवर प्रतिक्रिया दिली. यावेळी ते म्हणाले की, टायर वैगरे जाळण्याच्या घटनांमुळे संजय राऊतांसारख्यांना संधी मिळते. तसेच त्यांनी यावेळी महाडमधील शिवसेना आंदोलनावर टीका केली.
