मुंबई : मागील काही काळात महाराष्ट्रात अनेक राजकीय उलथापालथ पहायला मिळाल्या आहेत. विधानसभा निवडणुकीतही महायुतील मोठे यश मिळाले. यातच आता माजी मंत्री बच्चू कडू यांनी ठाकरे व पवार यांचा पक्ष लवकरच केंद्रातील भाजपसोबत दिसेल, असा दावा केला. त्यांच्या या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
काय म्हणाले बच्चू कडू ?
“देशात ज्या मोठ्या राजकीय उलथापालथ होणार आहेत, त्या शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबाबत असून शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे लवकरच केंद्रात भाजपसोबत जाताना दिसतील. ज्या पद्धतीने नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू हे एक दोन विधेयक पास करण्यासाठी भाजपसोबत थांबले आहेत, ते गेल्यानंतरची सोय सध्या भाजप बघत असून त्यात शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांची उबाठासेना यांचा प्रामुख्याने विचार आहे. कारण, या दोन्ही पक्षाकडील खासदारांची संख्या पाहता संजय राऊत यांनी केलेले वक्तव्य हेच दाखवत आहे. तसेच आता पुन्हा आपल्याकडे सत्ता येणार असल्याने कोणी पक्ष सोडून जाऊ नये हाच राऊत यांचा प्रयत्न आहे,” असे बच्चू कडू यांनी म्हंटले आहे.
बच्चू कडूंचा भाजपला टोला
“एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याकडून असलेली गरज सध्या भाजपसाठी संपलेली असून त्यांची मोघलाई निती आहे. आपल्यापासून लांब चालला की कापून टाकायचं असं हे मुघलांचे बच्चे आहेत,” असा टोला कडू यांनी भाजपला लगावला. राज्यात आलेलं सरकारच भ्रष्ट मार्गाने आल्याने येथील मंत्री उघडपणे भ्रष्टाचाराबाबत बोलत असतील तर त्यांचे अभिनंदन केले पाहिजे, असे म्हणत कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना लगावला.
दरम्यान, राज्यातील दोन जिल्ह्यांतील पालकमंत्री पदावरून एकनाथ शिंदे नाराज असल्याची सध्या चर्चा सुरू आहे. त्यावरून बच्चू कडू म्हणाले, जेव्हा मोठे नेते नाराज असतात, तेव्हा समजायचे की ते अतिशय खुश असतात आणि जेव्हा ते अतिशय खुश असतात तेव्हा ते खूप नाराज असतात. पालकमंत्रीबाबत ज्या पद्धतीने वाद सुरू आहेत हे पाहता आता भाजप राज्यभर एकट्याचे पालकमंत्री बनवेल,” असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला.
