बायपास, विकास आराखडा, ब्लू रेषा, काळ नदीवर बंधारा हे प्रश्न प्राधान्याने मार्गी लावावेत
सलीम शेख
माणगाव : दक्षिण रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुका हा महत्वाचा ठिकाण असून येथे नगरपंचायत आहे. या माणगाव शहरातील प्रलंबित प्रश्नांकडे मंत्री, खासदार,आमदारांनी जातीने लक्ष घालण्याची गरज असून बायपास, विकास आराखडा, ब्लू रेषा, काळ नदीवर बंधारा हे प्रश्न प्राधान्याने मार्गी लावावेत अशी मागणी माणगावकरांकडून होत आहे.
मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम गेली १५ वर्षांपासून रखडलेले आहे. या कामाला शासनाने गती देण्याची आवश्यकता आहे. माणगाव बायपासचे कामही गेली अनेक वर्षे रखडले असून याचा फटका वाहतूक कोंडीवर बसत आहे. या बायपासचे काम अद्याप झालेले नसल्याने वाहन चालकांना माणगाव शहरातून जावे लागते. सुट्टीच्या काळात तर माणगाव शहरात चालणेही कठीण होऊन बसले आहे. नागरिकांना रस्ता ओलांडताना फार जिकरीचे झाले आहे. या वाहतूक कोंडीचा फार त्रास हा माणगावकरांना सोसावा लागत आहे. त्यामुळे बायपासचे काम झाल्यास शहरातील थोडी वाहतूक कोंडी दूर होऊ शकेल. हा प्रश्न शासनाने लवकरात लवकर मार्गी लावावा अन्यथा माणगावकर रास्ता रोको आंदोलन छेडण्याच्या विचाराधीन आहे. त्याचबरोबर माणगावचा विकास आराखडा शासनाने लवकरात लवकर मंजूर करावा. माणगाव शहराला शासनाने ब्लु रेषेच्या खाईत लोटले आहे. माणगाव शहराला कोणताही पुराचा धोका नसताना शहरावर ब्लु रेषा लादण्यात आली आहे. १९९५ मध्ये तसेच २००५ मध्ये आलेल्या महापुराच्या वेळेसही माणगाव शहरात तसेच नगरपंचायत हद्दीतील गावात तेवढेसे पाणी पाणी शिरलेले होते. त्या काळातही माणगावकर सुखरूप होते. मग माणगावावर ब्लु रेषा लादण्याची गरज नव्हती. या ब्लु रेषेच्या भीतीमुळे शहरातील अनेक नागरिक घर बांधण्याची हिंमत करीत नाहीत. तरी शासनाने माणगावकरणांवर लादलेली हि ब्लु रेषा उठवावी.
विकासकामांचा विचार करीत माणगाव काळ नदीवर बंधारा बांधण्याची गरज आहे. खास करून उन्ह्याळ्यात माणगावच्या काळ नदीच्या पाण्याची पातळी बऱ्याच अंशी आटते. त्यामुळे उन्हाळ्यात माणगावकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. यासाठी शासनाने लवकरात लवकर माणगाव काळनदीवर बंधारा बांधण्याची गरज आहे. माणगावच्या विकासाच्या दृष्टीने हे सारे प्रश्न, समस्यां महत्वाचे असून या प्रश्नाकडे मंत्री अदिती तटकरे, खा. सुनील तटकरे, आ. भरत गोगावले यांनी जातीने लक्ष घालून माणगावकरांचे हे प्रश्न लवकरात लवकर सोडवावेत अशी मागणी माणगावकरांतर्फे करण्यात येत आहे.