• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उरण तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे हजेरी लावून पलायन!

ByEditor

Jul 28, 2023

पळपुट्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी

घन:श्याम कडू
उरण :
गेली ५ ते ६ दिवसांपासून पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे उरणमध्ये पूरपरिस्थिती व दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. मात्र यावेळी तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी हे हजेरी लावून पलायन करीत असल्याचे दिसत आहेत. तरी पळून जाणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

राज्यात पावसाने अक्राळविक्राळ स्वरूप धारण केले आहे. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती निर्माण झाली आहे. परिस्थितीवर मात करण्यासाठी संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांना हजर असणे बंधनकारक केले आहे. उरणमधील कर्मचाऱ्यांना ही नियम लागू होत आहे. मात्र तालुक्यातील परिस्थिती भयानक असतानाही तालुक्यातील ग्रामपंचायतमधील कर्मचारी हे हजेरी बुकवर सही मारून दिवसभर बेपत्ता राहून इतरांच्या उठबस करीत असल्याचे चित्र पहावयास मिळते. परंतु सदर कर्मचाऱ्यांवर कोणतीच कारवाई होताना दिसत नाही.

चाणजे ग्रामपंचायत हद्दीतील द्रोणागिरी गडावरील दरड कोसळण्याची दुर्घटना घडूनही घटनास्थळी ग्रामपंचायत कर्मचारी हजर नसल्याचे दिसून आले. मात्र सदर कर्मचाऱ्यांनी सकाळी हजेरी बुकवर हजर असल्याची सही केल्याचं दिसत आहे. सदर कर्मचारी इतरांची कामे घेऊन नवी मुंबई कार्यालयात असल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून समजली. याबाबत ग्रामविकास अधिकारी राम म्हात्रे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी कर्मचारी हजेरी लावून गायब असल्याचे मान्य केले. तरी अशा कामचुकार कर्मचाऱ्यांना सेवेतून निलंबित करण्याची मागणी चाणजे ग्रामस्थांकडून जोर धरू लागली आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!