छत्रपती संभाजीनगर : गेवराईच्या पायगा येथील सरपंच मंगेश साबळे त्यांच्या अनोख्या आंदोलनामुळे चर्चेत असतात. यापूर्वी त्यांनी पैसे उधळून तर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी स्वत:चा गाडी जाळून आंदोलन केलं होतं. आता त्यांनी गावातील पाणी प्रश्नावरुन देखील आक्रमक आंदोलन केले आहे. गावाला पाणी मिळत नसल्याने गावचा सरपंच साडी घालून जिल्हा परिषदेत दाखल झाले.
गावातील पाणी प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मंगेश साबळे यांनी साडी घालून जिल्हा परिषद कार्यालयाबाहेर आंदोलन केले. गावकऱ्यांना पाणी समस्येला तोंड द्यावे लागते. मागील ४ वर्षापासून गावात जल जीवन मिशनचं काम अपूर्ण आहे. या कामाकडे सरकारने लक्ष द्यावे यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीणा यांच्या कार्यालयाबाहेर मंगेश सांबळे यांनी आंदोलन केले. २०२०-२१ काळात जल जीवन मिशन अंतर्गत १ कोटी ८० लाखाचे काम मंजूर करण्यात आले होते. मात्र पाईपलाईन टाकूनही ४ वर्ष झाली तरी पाणीपुरवठा सुरू झाला नाही असा आरोप त्यांनी केला. तसेच योजनेला निधी मिळतो, पण काम प्रत्यक्षात होत नाही. अधिकारी काम करत नाहीत. ४ वर्ष झाली, महिलांना प्यायला पाणी मिळत नाही यात काही भ्रष्टाचार झालाय का असा सवाल करत सरकारने नव्या घोषणा करण्याऐवजी आधीच्या योजनांची अंमलबजावणी करावी अशी मागणी सरपंच मंगेश साबळे यांनी केली. विशेष म्हणजे यंदाच्या अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२८ पर्यंत जल जीवन मिशनला मुदतवाढ देण्याची घोषणा केली. त्यात १५ कोटी कुटुंबाला नळाद्वारे पाणी मिळत असल्याचं सांगण्यात आले.
मंगेश साबळे हे त्यांच्या अनोख्या आंदोलनासाठी कायम चर्चेत असतात. सरकारी कार्यालयासमोर पैसे उधळणे, मराठा आरक्षणासाठी स्वत:ची नवी कोरी कार जाळणे यासारखे प्रकार केल्याने साबळे चर्चेत असतात. मंगेश साबळे यांच्या आंदोलनाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत जालना लोकसभा मतदारसंघात मंगेश साबळे यांनी निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत मंगेश साबळेंचा पराभव झाला असला तरी त्यांना १ लाख ५५ हजार मते पडली होती.