• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

ज्यांनी गद्दारी केली त्यांना गाडून टाका -भाई जयंत पाटील

ByEditor

Feb 10, 2025

शेकापचा हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत संवाद मेळावा

विश्वास निकम
कोलाड :
रोहा तालुक्यात रविवारी शेकापचे जयंतभाई पाटील, बाळाराम पाटील, जिल्हा चिटणीस सुरेश खैरे, सुप्रिया पाटील, खजिनदार अतुल म्हात्रे, महाराष्ट्र राज्य महिला आघाडीप्रमुख मानसी म्हात्रे, नेते शंकरराव म्हसकर, मारुती खांडेकर, शिवराम महाबले यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत संवाद मेळावा मोठया उत्साहात पार पडला. या मेळाव्याला रोह्यातील असंख्य कार्यकर्ते पाहून जयंत पाटील अक्षरशः भारावून गेले. त्यामुळे पुन्हा जुन्या काळातील आठवणींना उजाळा देत टोलेबाजी करत ज्यांनी पक्षाशी गद्दारी केली, ज्यांना पक्षाने मोठें केले तेच पक्ष सोडून गेले अशांना गाडण्यासाठीच जिल्हयात तसेच तालुकास्तरावर कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असून येत्या काळात यांना गाडण्यासाठी सज्ज व्हा, जी चूक माझ्याकडून झाली ती पुन्हा होणार नाही. त्याची दिलगिरी कार्यकर्त्यांसमवेत व्यक्त करत खरपूस समाचार घेतला.

ज्यांनी आम्हाला आताच्या निवडणुकीत पाडले त्यांना पाडून त्यांची जागा दाखवून देऊ. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत जिल्हा परिषदेत सत्ता आपल्या हातून कोणी घेऊ शकत नाही. त्यामुळे पुन्हा ताकतीने पक्षाची वाटचाल सुरू केली आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात पक्षासाठी काम करण्यासाठी नव्या पिढीला तसेच महिलांना अधिकाधिक संधी दिली पाहिजे. पक्षात नवे बदल करण्यात येतील. माझा विश्वास तुमच्यावर आहे. आजही शेकापची ताकद रोहा येथे दिसून आल्याचा आनंद असून पक्षात बदल घडवून आणायचे असेल तर तरुण, महिलांना प्राधान्य देत जबाबदारी दिली पाहिजे असे प्रतिपादन रोहा येथील कार्यकर्ता मेळाव्यात शेकाप नेते जयंतभाई पाटील यांनी केले.

नवी जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर दिली ते रायगड जिल्हा चिटणीस सुरेश खैरे हे उत्तम प्रकारे पक्षाचे काम करत युवा पिढीशी संवाद साधत आहेत. त्याचबरोबर महीला म्हणून मानसीताई तसेच चिऊताई या युवती आणि महीला यांच्याशी संवाद साधून नवी दिशा देण्याचे काम करत आहेत. आपण निवडणूकीत हरलो म्हणून मने खचली होती, पण खचून जाऊ नका, पुन्हा जोमाने पक्ष उभा करू, मी सदैव प्रयत्नशील आहे. पुढे पाहू, असा विश्र्वास आणि आधार कार्यकर्त्यांना जयंत पाटील यांनी याप्रसंगी दिला.

रोह्यात अभूतपूर्व प्रतिसाद लाभलेल्या या मेळाव्यात सारेच भारावून गेले. रोह्यात पुन्हा लाल बावटा फडकणार, पराभव झाला असला तरी प्रचंड मताधिक्य मिळाले आहे. ज्यांना मोठे केले ते खोटे निघाले आशा गद्दारांना गाडून टाकण्यासाठी पक्षाशी एकनिष्ठ रहा. आपल्याच ओटीवर बसा विरोधकांच्या ओटीवर बसू नका, घात होतो. त्यामुळे नवी पिढी घडवायची आहे तर ती चांगली प्रशिक्षित करायची आहे. दोनशेहून अधिक महीला प्रशिक्षित करायच्या आहेत. त्यांना शैक्षणिक, आर्थिकदृष्ट्या सक्षम करायचे आहे. त्यामुळे आता पुन्हा जोमाने कामाला लागा असे आवाहन जयंत पाटील यांनी केले.

शेकापचे निष्ठावान कार्यकर्ते देशमुख यांनी आपली भावना व्यक्त करताना सांगितले की, तुम्हीच युती करून आम्हाला मतं देण्यास सांगितले आणि आमचे वाटोळे झाले असे म्हणताच एकच हशा पिकला. त्यावर जयंत पाटील यांनी चुकीची माफी मागताच एकच टाळ्यांचा गजर करीत लाल बावटे की जय अशा जोरदार घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या.

सुरेश खैरे यांची बांधणी आज जिल्हयातील उरण, पेण,सुधागड पाली पाठोपाठ रोहा येथे पाहायला मिळाली. पक्षाला खंबीर नेतृत्व सुरेश खैरे आणि अतुल म्हात्रे यांच्या रूपाने मिळाले आहे. जे गेले त्यांनी बीजेपीच्या माध्यमातून कुठलीही गंगा आणली नाही. गंगा शेकापने आणली. नेते जयंतभाई पाटील यांचे सच्चे आणि निष्ठावंत कार्यकर्ते आज संवाद मेळाव्यातून पाहायला मिळत असल्याचा आनंद व्यक्त करत महिलांनो अधिक सक्षम व्हा अधिक जोमाने काम करायचे आहे असे महिला आघाडी प्रमुख मानसी म्हात्रे कार्यकर्त्यांना आवाहन केले.

रायगडमध्ये पक्षाचा संवाद मेळावा चालू आहे. खासदारकीची निवडणूक झाली, त्यानंतर लोकांची मनं खचली होती. पण कार्यकर्त्यांनी खचून जाऊ नये हा संवाद मेळाव्याचा मुख्य हेतू आहे. आजही पडलो असलो तरी शेकापचा मतांचा आकडा कायम आहे. तालुक्यात पैसेवाले जरी गेले असले तरी कार्यकर्ते जागेवर आहेत. पक्षाची फळी मजबूत आहे. सामाजिक चळवळीतून आपल्या पक्षाची ओळख आहे. येणाऱ्या काळात तिसरी मुंबई म्हणुन घोषित करण्यात येत आहे त्यामुळे या तालुक्यात पुढच्या काळात आमचा भूमिपुत्र हाच व्यावसायिक बनेल. त्याला उत्तम दर्जाचा रोजगार उपलब्ध होईल याकरिता प्रयत्न केले जातील. जास्तीत जास्त तरुणांनी पुढे येण्याची आवश्यकता असल्याचे अतुल म्हात्रे यांनी बोलताना सांगितले.

संवाद मेळाव्यातील कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना नेते शंकरराव म्हसकर म्हणाले की, शेकापचा कार्यकर्ता हा सक्षम कार्यकर्ता आहे. कुंभाराने बनविलेल्या मडक्यात चुकून एखादं मडकं कच्चं असते आणि ते फुटते परंतु त्यात पुन्हा बदल करून उत्तम प्रकारची मडकी घडविण्याचे काम पुन्हा करू. येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत लाल बावटा फडकेल असे सांगितले.

या संवाद मेळाव्यात तांबडी येथील उद्योजक विठोबा सितप, कार्यकर्ते वाईकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शेकापत नेते जयंतभाई पाटील यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला. तर नेते शंकरराव म्हसकर यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या मेळाव्यात हजारो महिला, पुरुष, तरुण यांनी उपस्थिती लावली होती.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!