वाल पिकांवर अमरवेलीचे संकट; कृषी व वनविभागाचे दुर्लक्ष
अनंत नारंगीकर
उरण : चिरनेर परिसरात वानरांचा उपद्रव वाढला असून वानर व उंदरामुळे शेती व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. वानरे व उंदीर वाल, चवळी, आंबा, भाजीपाल्याचे नुकसान करत आहेत. कृषी व वनविभागाच्या दुर्लक्षितपणामुळे शेतकरी संकटात सापडले असतानाच वाल, चवळी पिकांवर अमरवेलीचे संकट ओढावत आहे.
चिरनेर, कळंबुसरे गावातील शेतकरी हे भात शेतीला जोडधंदा म्हणून आपल्या शेत जमीनीत रब्बी हंगामातील पीक म्हणून वाल, चवळी, हरभरा, मुग तसेच भाजीपाला या पिकाचे उत्पादन घेत आहेत. परंतु सातत्याने डोंगराचे होणारे उत्खनन यामुळे अन्न पाण्याच्या शोधात वन्यप्राण्यांनी आपला मोर्चा नागरी वस्तीकडे वळविला आहे. सदर वानर जातीचे प्राणी हे रहिवाशांच्या घरांचे नुकसान करत असून त्याचा त्रास महिला व लहान मुलांनाही होत आहे. त्यात शेतकऱ्यांनी अपार कष्ट करून पिकविलेल्या वाल, चवळी, हरभरा, मूग पिकांचे वानरे व उंदीर नुकसान करत असल्यामुळे शेतकऱी चिंताग्रस्त झाला आहे. वानरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत असताना वाल, चवळी पिकांवर अमरवेलीचे संकट ओढावत आहे.
चिरनेर , कळंबुसरे परिसरामध्ये वानरांमुळे व उंदरामुळे नागरिक, शेतकरी त्रस्त आहेत. भाजीपाला, आंबा फळांचे नुकसान झाले आहे. तसेच सदर पिकांवर अमरवेलीचे संकट ओढावत आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेली वाल, चवळी, मूग पिके वाया जात आहेत. वानरांचा व उंदरांचा वेळीच बंदोबस्त केला नाही, तर शेतकऱ्यांनी वाढवलेल्या पिकांचे नुकसान होणार आहे.
जीवन नारंगीकर,
शेतकरी, चिरनेर