रायगड : कोकणात शिवसेना ठाकरे गटाला गळती लागल्याचे दिसून येत आहे. माजी आमदार राजन साळवी यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करून ठाकरेंना मोठा धक्का दिलाय. तर कोकणातील ठाकरेंच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. कोकणातील आमदार भास्कर जाधव आणि माजी आमदार वैभव नाईक हे दोन शिलेदार ठाकरेंकडे राहिलेले आहेत. उद्धव ठाकरेंकडून कोकणातील डॅमेज कंट्रोलसाठी प्रयत्न केले जात आहेत. वैभव नाईक यांनी सोमवारी उद्धव ठाकरे यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली आहे. आता भरत गोगावले यांनी वैभव नाईक यांच्याबाबत मोठा दावा केलाय.
राजन साळवी यांच्या मागे एसीबीच्या चौकशीचा ससेमिरा लागला होता. त्यानंतर ते एक दोन वेळा उद्धव ठाकरे यांना भेटले आणि अखेर शिंदे गटात त्यांनी प्रवेश केला. तर दुसरीकडे वैभव नाईक यांच्या मागेदेखील एसीबी चौकशी ससेमिरा लागला आहे. वैभव नाईक यांनी देखील उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे. मात्र उद्धव ठाकरेंची भेट घेण्याआधी त्यांनी आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबतच सोबतच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. आता यावरून भरत गोगावले यांनी मोठं भाष्य केले आहे.
ठाकरे गटाने ऑपरेशन टायगरची धास्ती घेतली आहे? ठाकरे गटाने लोकप्रतिनिधींची बैठक बोलावली आहे. याबाबत विचारले असता भरत गोगावले म्हणाले की, अशा मिटिंग जर त्यांनी अगोदरच घेतल्या असत्या तर ही वेळ आली नसती. परंतु ही वेळ आणून देण्याचं काम एकनाथ शिंदे साहेबांनी केले आहे. कारण एकनाथ शिंदे हे सामान्य माणसाचे नेते आहेत. ते काम करत आहेत त्यामुळे लोकांना विश्वास वाटत आहेत. त्यामुळेच लोक एकनाथ शिंदे यांच्याकडे येत आहेत. अनेक लोक अजूनही लाईनमध्ये आहेत. येत्या आठवड्याभरात कोकणामध्ये आमच्या पक्षात अनेक लोक येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
वैभव नाईक यांच्याशी चर्चा सुरू
वैभव नाईक यांच्याबाबत विचारले असता भरत गोगावले म्हणाले की, वैभव नाईक यांच्याशी चर्चा सुरू आहे. सगळ्याच गोष्टी आम्ही उघडपणे सांगणार नाही. काही गोष्टी गुप्त ठेवाव्या लागतात. परंतु योग्य वेळेला तुम्हाला ते सांगितलं जाईल. वैभव नाईक यांची एसीबीची चौकशी सुरू आहे म्हणजे त्या आरोपी झाले असे होत नाही. ते चौकशीला सामोरे जातील आणि त्यातून काही निर्णय ते घेतील, असे त्यांनी म्हटले.