• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मुंडेंची दादागिरी! आदिवासी शेतकऱ्याची फसवणूक करून जागा हडपण्याचा प्रयत्न!

ByEditor

Feb 21, 2025

कर्जत तालुक्यातील सराई वाडीतील जमीन प्रकरण न्यायप्रविष्ट असताना शेतकऱ्याची फसवणूक

गणेश पवार
कर्जत :
मुंडे कुटुंबाकडून कर्जत तालुक्यातील सराई वाडीतील आदिवासी शेतकऱ्यांची फसवणुक करून जागा हडप करण्याचा प्रयत्न सुरू आहे. दरम्यान, पोलीस प्रशासन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे न राहता या धनदांडग्यांसोबत असल्याचा आरोप पीडित शेतकऱ्याकडून करण्यात आला आहे. सदर जागेचे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना आता मुंडे कुटुंबाकडून थेट शेतकऱ्यांनाच धमकी दिली जात असून परस्पर जागा विक्रीचा व्यवहार सुरू केल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत.

रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात येत असलेली मौजे सुगवे सराई या आदिवासी वाडीतील जागा सर्वे नंबर ६५/२ अ, क्षेत्र ७-४२-o, आकार तीन ही १८ एकर जमीन मिळकत परशुराम पदुसराई आणि आलो लक्ष्मण सराई यांची वडिलोपार्जित आहे. दरम्यान, मुंबई मालाड गोविंद नगर येथे राहणारे मूळचे बीड जिल्ह्यातील शशिकांत बाबुराव मुंडे आणि अमोल शशिकांत मुंडे या वडील आणि मुलाने शेतकरी परशुराम पदुसराई यांना मिळकतीचे वारसामध्ये जागेत वाटप करून देतो म्हणून सदर आदिवासींना फसवून खोटे कागदपत्र तयार करून बेकायदेशीरपणे ही जागा स्वतःच्या नावे करून घेतल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. दरम्यान, आजही ही जागा शेतकरी वारसाहक्काने नावे असल्याने त्यांच्या ताब्यात असून, या जागेवर शेतकरी वर्षाकाठी भाताची लागवड तसेच नाचणी, वरी, भाजीपाला, फळ पीक लागवड करीत आहेत. मात्र, या जागेबाबत शेतकरी कुळकायद्यानुसार कुटुंबप्रमुख मोठा मुलगा पदू विकास सराई यांच्या नावाची नोंद झालेली असताना काही अडचणींमुळे दुसरा मुलगा गोमा भिका सराई यांची नावाची नोंद राहून गेली होती. सदर जागेवर नाव नोंदवून देण्याच्या उद्देशाने आलेले मुंबई स्थित शशिकांत बाबुराव मुंडे यांनी सन २०१६ मध्ये शेतकऱ्यांना आपल्या स्वखर्चाने जागेवर नाव नोंदवून देतो या बहाण्याने कर्जत तहसील कार्यालयात नेले होते. शेतकऱ्यांचा अज्ञानाचा फायदा घेत एका कागदावर शेतकऱ्यांचे अंगठे देखील घेतले होते.

दरम्यान, आता मुंडे यांनी अचानक शेतकरी कसत असलेल्या शेतीवर दावा करीत शेतकऱ्यांची अडवणूक करण्यास सुरुवात केलेली आहे. शिवाय शेतीची जागा बिनशेती व प्लॉट न करता त्या जमीन मिळकतीचे तुकडे करून परस्पर विक्री करत असल्याचे समोर आले आहे. त्याच बरोबर शेतकऱ्यांना फसवून जागेच्या सातबारावर कुळ कायदा कलम ३२ ग चा दावा दाखल करून मुंडे यांनी महसूल अधिकाऱ्यांना हाताशी धरून कुळ कायदा दावा क्रमांक २५/२०१६ दाखल करून शेतकऱ्यांच्या नावे फक्त ०-४२-० एवढ्या मिळकतीवर नावे ठेवण्यात आलेली आहेत. तर मुंडे यांनी आपले नाव जास्तीत जास्त क्षेत्र असलेल्या सातबारा ह्या मिळकतीवर नोंदवली आहे. याही पलीकडे जावून मुंडे यांनी वन विभागाच्या जागेवर बेकायदेशीर रिसॉर्ट बांधण्याचा घाट घातला असताना, वनविभागाचेही याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.

एकूणच आता शेतकरी पीक घेत असलेल्या जागेवर मुंडे यांनी शेतकऱ्यांना धमकवण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांचा धाक दाखवून जागा हडपण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत. एकीकडे जागे संदर्भात आमची लढाई ही न्यायालयात सुरू असताना, दुसरीकडे धनदांडगे आमच्याच जागेवर येवून आम्हाला दमदाटी करीत शिवीगाळ करीत असल्याचे शेतकरी सांगतात. शिवाय बीडचे मुंडे ओळखत नाही का? म्हणून धमकावत असल्याचा आरोपही होत आहे.

एकीकडे छत्रपतींच्या काळात शेतकऱ्यांच्या भाताच्या कणसाला जरी कोणी हात लावला तर कठोर कारवाई होत होती, परंतु आता शेतकऱ्यांचे संरक्षण करणारेच लुटारू बनले आहेत. कर्जत तालुका हा तिसरी मुंबई म्हणून ओळखला जात असून येथील जागेला सोन्याचे भाव आलेत. त्यामुळे येथील शेतकऱ्यांची फसवणुक केली जात असल्याचे चित्र समोर येत आहे. सध्या राज्यात मुंडे प्रकरण गाजत असताना आता कर्जतमध्ये देखील एका मुंडे प्रकरणाने शेतकरी हवालदिल झालेत. त्यामुळे आता या आदिवासी शेतकऱ्यांना न्याय कोण देणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी रायगड जिल्हा हरहर चांगभलं धनगर समाज संस्था पुढे आली असून याबाबत दिवाणी न्यायालय कर्जत येथे 67/2024 चा सुरू असलेला खटला ॲड. दीपक रखमाजी पादिर हे लढत असून, मुंबई एमआरटी कोर्ट येथे एल-३६४/२०२४ येथील सुरू असलेला खटला ॲड. दीपक रखमाजी पादीर यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड. संतोष आखाडे हे लढत आहेत.

या जागेचा मूळ पाहिले तर ६२/२ अ या जागेचा १२ नोव्हेंबर १९८० मध्ये अप्पर तहसीलदार यांच्यासमोर झालेल्या निर्णयात पदु भिका सराई यांच्या नावावर करण्यात आली होती. त्या दरम्यान सावकार असलेले इब्राहिम मोहम्मद अली सारोळे त्यांच्या काळात हे संरक्षित कुळ म्हणून महादू सराई हे त्यावेळी शेती राखत होते. दरम्यान त्यावेळी जागा जीवनलता शादीलाल मेहरा यांना १९८० मध्ये पॉवर देण्यात आली होती. नंतर 1997 मध्ये ही पॉवर शशिकांत मुंडे यांच्या नावावर घेतली असे सांगण्यात आले तर आता हीच पॉवर २०१६ मध्ये मुंडे शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून फेरफार करून वापरत आहेत. परंतु पॉवर देण्यात आलेली व्यक्ती जेव्हा मयत होते तेव्हा तिची पॉवर संपते.
-ॲड. संतोष आखाडे,
पिडित आदिवासी शेतकरी यांचे वकील

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!