• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

माणगाव बस आगाराला जुन्या गाड्यांचा डोस!

ByEditor

Feb 21, 2025

आगाराची साडेसाती संपेना, अपुऱ्या गाड्यांमुळे ग्रामीण आणि लांबपल्यांच्या फेऱ्यांना ब्रेक

सलीम शेख
माणगाव :
माणगाव बस आगार हा रायगड जिल्ह्यातील एक महत्त्वाचा वाहतूक केंद्रबिंदू आहे. हा परिसर मुंबई–गोवा व दिघी-पुणे महामार्गावर असल्याने येथे सतत प्रवाशांची वर्दळ असते. मात्र, अपुऱ्या बसगाड्यांमुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. स्थानिक तसेच लांबपल्ल्याच्या प्रवासासाठी पुरेश्या बसगाड्या उपलब्ध नसल्याने प्रवाशांना खासगी वाहतुकीचा अवलंब करावा लागतो. परिणामी, एसटी महामंडळाचे उत्पन्न घटत आहे, अपुऱ्या बसगाड्यांमुळे अडचणी वाढत आहेत. सध्या माणगाव आगारात सध्या ३१ बसगाड्या कार्यरत आहेत. त्यापैकी १५ सीएनजी व १६ डीझेलवर चालणाऱ्या आहेत तर ६ खासगी भाडेतत्वावर घेतल्या असून त्या लांब पल्यांच्या प्रवाशांसाठी वापरल्या जात आहेत. मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक आणि कोकणातील विविध भागांना जाणाऱ्या – येणाऱ्या गाड्या वेळेवर उपलब्ध नसल्याने अनेकजण खासगी वाहनांकडे वळत आहेत. हा आगार १४ एप्रिल २०११ मध्ये सुरु झाला. त्याला १४ वर्ष लोटली. तरीही या आगारात जुन्या बस गाड्यांवर कामकाज चालवले जाते. त्यामुळे या आगाराची जुन्या गाड्यांची साडेसाती कांही संपता संपेना झाली असून माणगाव बस आगाराला जुन्या गाड्यांचा डोस आजही दिला जात आहे.

माणगाव बस आगार हे मुंबई – गोवा महामार्गावरील कोकणचे प्रवेशद्वार म्हणून समजले जाते. येथील एसटी बसगाड्या अपुऱ्या असल्यामुळे प्रवाशांना खासगी ट्रॅव्हल्सचा आधार घ्यावा लागतो. याचा थेट फटका विद्यार्थी, नोकरदार, शेतकरी आणि लहान – मोठ्या व्यावसायिकांना बसतो. एसटीच्या तुलनेत खासगी वाहनांचे भाडे जास्त असल्याने सर्वसामान्य प्रवाशांना आर्थिक ताण सहन करावा लागतो. विशेषतः ग्रामीण भागातून माणगावला येणाऱ्या – जाणाऱ्या नागरिकांसाठी हा मोठा जटील प्रश्न बनला आहे. या बस आगाराच्या उत्पन्न वाढीसाठी नव्या बसगाड्यांची आवश्यकता आहे. परिवहन मंत्री ना. प्रताप सरनाईक यांनी धाराशिव येथे नुकताच परिवहन मंगळाच्या बस मधून प्रवास करून येत्या ४ महिन्यात २६०० बसेस महाराष्ट्रात देणार तर वर्षभरात आणखी ३००० बसेस असे एकूण ५६०० बसेस महाराष्ट्रात देणार असल्याची ग्वाही दिली. धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री परिवहन मंत्री असल्याने त्यांनी धाराशिव जिल्ह्याला २५ बस प्राप्त करून दिल्या. उर्वरित ५० बसेस देणार असल्याचे जाहीर केले. मात्र माणगाव बस आगाराला नवीन गाड्या कधी मिळणार ? असा संतप्त सवाल प्रवासी नागरीकातून बोलताना व्यक्त होत असून माणगाव आगाराला नव्या बसगाड्या मिळाल्या, तर प्रवाशांची गैरसोय दूर होऊन उत्पन्नवाढीस मदत होईल. अधिक बसगाड्या उपलब्ध झाल्यास दिवसाला जास्त फेर्‍या चालवता येतील आणि त्यामुळे अधिक उत्पन्न मिळू शकेल. शिवाय, लांबपल्ल्याच्या प्रवाशांसाठी विनाविलंब सेवा पुरवता येईल.

स्थानिक प्रवासी आणि नागरिकांकडून अनेक वेळा नवीन बसगाड्यांची मागणी होत आहे. तथापि, प्रशासनाकडून अद्याप ठोस पावले उचलली गेलेली नाहीत. जर एसटी महामंडळाने माणगाव आगारात नवीन बसगाड्या उपलब्ध करून दिल्या, तर येथील वाहतुकीला गती मिळेल आणि स्थानिक नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ होईल. सध्या या आगाराला जुन्या बस गाड्या आणि त्याही अपुऱ्या असल्याने दिवसाला सुमारे अडीज लाखाचे उत्पन्न मिळते. आणखी किमान ४० गाड्यांची माणगाव बसआगाराला गरज असून या डीजेल गाड्या उपलब्ध झाल्यास दिवसाला सरासरी ४ लाखापेक्षा जास्त उत्पन्न मिळू शकेल. तसेच वाढत्या बस गाड्यांबरोबरच वाहक चालक कर्मचारी वर्ग पुरेसा दिल्यास बस आगार फायद्यात येईल आणि माणगाव बस आगाराला नवी झळाळी मिळेल. माणगाव बस आगारात २०२३ पासून ६ खाजगी बस गाड्या भाडे तत्वावर गेतल्या असून त्या लांब पल्यासाठी वापरल्या जात असून त्यातून आगाराला उत्पन्न चांगले मिळत आहे. इतर ३१ गाड्या असून १६ डीजेल व १५ सीएनजी गाड्यांवर काम चालत आहे. यापैकी डीजेल गाड्या जुन्या असून त्या वारंवार दुरुस्ती करून काम चालवावे लागते. त्यामुळे उत्पन्नावर परिणाम होत आहे. बस गाड्या व चालक – वाहक पुरेसे दिल्यास माणगावच्या आगाराला चागले दिवस येतील. १५८ चालक – वाहक आगाराला कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. मात्र १०८ चालक – वाहक सध्या काम करत आहेत. त्यामुळे चालक – वाहकांना डबल ड्युटी करावी लागते. १४ वर्षानंतरही आगाराची वाताहत सुरूच आहे. याकडे शासन व लोकप्रतिनिधीनी डोळेझाक चालवली आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!