• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

“हिंमत असेल तर नीलम गोऱ्हेंनी उद्धव ठाकरेंवर गुन्हा दाखल करावा”, बच्चू कडू यांचं मोठं विधान

ByEditor

Feb 24, 2025

मुंबई : दिल्लीत ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नुकतेच पार पडले. तीन दिवस झालेल्या या संमेलनाला महाराष्ट्रासह दिल्लीत राहणाऱ्या मराठी माणसांनी मोठा प्रतिसाद दिला. पण या साहित्य संमेलनात बोलताना शिवसेना (शिंदे) पक्षाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर एक गंभीर आरोप केला. “ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडिज गाड्या दिल्या की एक पद मिळतं”, असं विधान नीलम गोऱ्हे यांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर केलं. त्यांच्या या विधानामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली.

यावरून खासदार संजय राऊत यांनी देखील जोरदार टीका केली. एवढंच नाही तर शरद पवार यांनी देखील प्रतिक्रिया देत नीलम गोऱ्हे यांचं विधान चुकीचं असल्याचं म्हटलं. दरम्यान, यानंतर आता प्रहार संघटनेचे नेते तथा माजी आमदार बच्चू कडू यांनीही या वादात उडी घेतली. “हिंमत असेल तर नीलम गोऱ्हेंनी उद्धव ठाकरेंवर गुन्हा दाखल करावा”, असं बच्चू कडू यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

“शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी जर उद्धव ठाकरे यांना मर्सिडीज गाड्या दिल्या असतील तर कोणत्या क्रमांकाच्या दिल्या ते त्यांनी सांगितलं पाहिजे. खरं तर नीलम गोऱ्हे यांच्याकडून आम्हाला या अपेक्षा नाहीत. त्या उद्धव ठाकरे यांच्याबाबत बोलल्या म्हणून मी बोलत नाही. मात्र, कोणत्याही नेत्यांना कोणत्याही नेत्यांच्या विरोधात बोलायचं असेल तर काही संदर्भ किंवा काही पुरावे दिले पाहिजेत. पण कोणतेही पुरावे न देता आपण बोलत असू तर ते योग्य नाही”, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

“तसेच जर नीलम गोऱ्हे यांनी जर उद्धव ठाकरे यांना गाडी दिली असेल तर कोणती गाडी दिली ते सांगावं. गुन्हे दाखल करावेत. नीलम गोऱ्हे यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी उद्धव ठाकरेंवर गुन्हा दाखल केला पाहिजे. नीलम गोऱ्हे या उपसभापती आहेत. त्यांनी असे बिनबुडाचे आरोप करू नयेत. मात्र, जर खरंच उद्धव ठाकरे यांनी गाड्या घेतल्या असतील तर नीलम गोऱ्हे यांनी रणरागिणी सारखं समोर आलं पाहिजे”, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!