पुणे : स्वारगेट एसटी आगारात २६ वर्षीय तरुणीवर झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणावर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केलेल्या वक्तव्याने नवीन वाद निर्माण केला आहे. त्यांनी म्हटले की, “घटनेच्या वेळी बसच्या आसपास १० ते १५ लोक उपस्थित होते, मात्र तरुणीने कोणताही प्रतिकार केला नाही, त्यामुळे कोणालाही संशय आला नाही आणि आरोपीने गुन्हा केला.” त्यांच्या या विधानानंतर तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर सरकारवर टीका होत आहे.
“प्रतिकार न केल्याने कोणालाही संशय आला नाही” –योगेश कदम
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत या प्रकरणावर स्पष्टीकरण दिले. त्यांनी सांगितले की, “अत्याचाराच्या वेळी आजूबाजूला अनेक लोक होते, मात्र पीडितेने कोणताही आवाज केला नाही किंवा प्रतिकार केला नाही, त्यामुळे लोकांना काही समजलेच नाही. त्यामुळे आरोपीला गुन्हा करता आला.” त्यांच्या या वक्तव्यामुळे संताप व्यक्त केला जात असून, पीडितेच्या मनस्थितीबाबत समज न ठेवता केलेल्या या विधानावर टीकेची झोड उठली आहे.
महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर उपाययोजना करण्याऐवजी जबाबदार पदावरील व्यक्तीकडून असे विधान येणे धक्कादायक असल्याचे अनेक महिला संघटनांचे म्हणणे आहे.
सरकारवर टीका, महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर
या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी माहिती गुप्त ठेवण्याच्या निर्णयावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सरकार आणि प्रशासनाने महिलांच्या सुरक्षेच्या दिशेने पावले उचलण्याऐवजी जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप विरोधक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. यासोबतच, आरोपी दत्तात्रय गाडे अजूनही फरार असून, पोलिसांना त्याचा शोध घेण्यात अपयश आले आहे. महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर सरकारने त्वरित कठोर पावले उचलावीत आणि आरोपीला लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे.