बॉक्साईट उत्खननाविरोधात ग्रामस्थांचा एल्गार
गणेश प्रभाळे
दिघी : रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील खुजारे या गावात सुरु असलेल्या बॉक्साईट खाणींविरोधात स्थानिक ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. या खाणींमुळे पर्यावरणाला मोठ्या प्रमाणात नुकसान होईल, तसेच स्थानिकांचे जीवनमान धोक्यात येईल, अशी भीती ग्रामस्थांना वाटत आहे. या विरोधात एकजुटीने लढा देण्यासाठी येत्या 20 मार्च 2025 रोजी ग्रामस्थांनी मोठा मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे.
या मोर्चाद्वारे प्रशासनाचे लक्ष वेधून खाण प्रकल्प रद्द करण्याची मागणी करण्यात येणार आहे. खुजारे गाव आणि परिसरातील नागरिकांनी खाणींमुळे होणाऱ्या संभाव्य धोक्यांबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. बॉक्साईट खाणकामामुळे जंगलांचे नुकसान, जलस्रोतांचे प्रदूषण आणि जैवविविधतेची हानी होण्याची शक्यता आहे. या भागातील घनदाट जंगल आणि निसर्गसौंदर्य हे स्थानिकांच्या उदरनिर्वाहाचे आधार आहेत. शेती आणि पर्यटनावर अवलंबून असलेल्या या गावकऱ्यांना खाणींमुळे त्यांचे जीवनमान उद्ध्वस्त होण्याची भीती आहे. “आमची जमीन, आमचे पाणी आणि आमचे जंगल आमच्यासाठी सर्वस्व आहे, असे गावातील एका तरुणाने संतापाने सांगितले.

ग्रामस्थांनी यापूर्वीही अनेकदा स्थानिक प्रशासनाकडे आपल्या मागण्या मांडल्या, परंतु त्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नाही. आता मोर्चाच्या माध्यमातून आपला आवाज थेट सरकारपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा मानस आहे. या मोर्चात गावातील महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. “आम्ही शांततापूर्ण मार्गाने आमचा विरोध नोंदवणार आहोत. पण जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर आम्हाला तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल,” असे ग्रामपंचायतीतील एका सदस्याने स्पष्ट केले.
पर्यावरण कार्यकर्त्यांनीही या लढ्याला पाठिंबा दर्शवला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, बॉक्साईट खाणींमुळे केवळ स्थानिकांचेच नव्हे, तर संपूर्ण कोकणातील पर्यावरणाचे संतुलन बिघडेल. हवामान बदलाच्या संकटात अशा प्रकल्पांना परवानगी देणे चुकीचे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. दरम्यान, प्रशासनाने अद्याप या प्रकरणी कोणतीही ठोस भूमिका जाहीर केलेली नाही. 20 मार्चचा मोर्चा हा ग्रामस्थांच्या संयमाची अंतिम कसोटी ठरेल, असे दिसते. या लढ्याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
आमदारांचे पत्र
ग्रामस्थांच्या वतीने बॉक्साईट मायनिंग प्रकल्प तात्काळ बंद करण्यात यावा आशा मागणीचे पत्र मंत्री भरतशेठ गोगावले यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
