मुंबई : महाराष्ट्रात सध्या वक्फ बोर्डच्या तब्बल 23566 मालमत्ता आहेत. त्यात एकट्या मराठवाड्यात मालमत्तेच्या 60% पेक्षा जास्त भागावर अतिक्रमण झाल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे याबाबत बोर्डाने 42 आदेश पारित केले. मात्र, त्यातल्या एकाही मलामत्तेची पुनर्प्राप्ती झाली नसल्याचे समजते. देशभर गाजणाऱ्या वक्फ बोर्डाची महाराष्ट्रात काय स्थिती आहे याचा आढावा घेताना ही बाब निदर्शनास आली आहे.
वक्फ बोर्डाच्या महाराष्ट्रातील मालमत्तांचे एकूण क्षेत्रफळ हेक्टरमध्ये 37330.97 आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर महसूल विभागामध्ये वक्फच्या 15877 मालमत्ता आहेत. त्याचे क्षेत्रफळ हेक्टरमध्ये 23121.10 आहे.
विदर्भातल्या नागपूर विभागात वक्फच्या 470 मालमत्ता असून त्यांचे क्षेत्रफळ हेक्टरमध्ये 3704.25 आहे. अमरावती महसूल विभागात वक्फच्या अमरावती 1310 मालमत्ता आहेत. त्याचे क्षेत्रफळ हेक्टरमध्ये 1102 इतके भरते.
नाशिक महसूल विभागामध्ये वक्फच्या 1455 मालमत्ता आहे. त्यांचे क्षेत्र 3340 हेक्टर भरते. महसूलच्या पुणे विभागामध्ये वक्फच्या 2728 मालमत्ता असून, त्यांचे क्षेत्रफळ हेक्टरमध्ये 3724.55 आहे. कोकणातही वक्फची मालमत्ता आहे. या ठिकाणी 1724 ठिकाणी मालमत्ता असून, त्यांचे क्षेत्रफळ 2339 हेक्टर भरते.
वक्फ बोर्डाकडे 8 लाख एकरपेक्षा जास्त जमीन
वक्फ बोर्डाकडे 2009 पर्यंत 4 लाख एकर जमीन होती, जी काही वर्षांमध्ये जवळपास दुप्पट झाली. 2023 मध्ये अल्पसंख्याक मंत्रालयाने लोकसभेत सांगितले होते की डिसेंबर 2022 पर्यंत वक्फ बोर्डाकडे एकूण 8 लाख 65 हजार 644 स्थावर मालमत्ता होत्या. म्हणजेच सध्या वक्फ बोर्डाकडे 8 लाख एकरपेक्षा जास्त जमीन आहे.
‘वक्फ’ हा अरबी शब्द आहे. अल्लाह आणि इस्लामच्या नावावर धर्मादाय हेतूने दान केलेल्या संपत्तीला ‘वक्फ’ असं म्हणतात. स्थावर आणि जंगम दोन्ही मालमत्ता वफ्फच्या कार्यक्षेत्रात येतात. भारताच्या वक्फ मालमत्ता व्यवस्थापन प्रणालीमधील माहितीनुसार देशात एकूण 30 वक्फ बोर्ड आहेत.
जवाहरलाल नेहरू सरकारने 1954 मध्ये ‘वक्फ कायदा’ केला. सन 1995 मध्येही वक्फ कायद्यातही बदल करण्यात आले, त्यानंतर प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात वक्फ बोर्ड स्थापन करण्याची परवानगी देण्यात आली. या कायद्यात दाव्यापासून वक्फ मालमत्तेची देखभाल करण्यापर्यंत अनेक तरतुदी आहेत.