• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

माणगावकर घेणार मोकळा श्वास!

ByEditor

May 2, 2025

वायू प्रदुषणातून होणार मुक्तता, कचऱ्याच्या विल्हेवाटीस प्रारंभ

नागरिकांनी मानले आभार

सलीम शेख
माणगाव :
शहरातील दत्त नगर परीसरातील आदिवासी आश्रमशाळेजवळील डम्पिंग ग्राऊंडला आग लागून वायू प्रदूषणाचा धोका निर्माण झाला होता. माणगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा शर्मिला सुर्वे यांनी तातडीने दखल घेऊन या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी विशेष प्रयत्न केले. या कामाचा विल्हेवाट लावण्याचा शुभारंभ १ मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर नगराध्यक्षा शर्मिला सुर्वे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यामुळे माणगावकर लवकरच मोकळा श्वास घेणार असून हा परिसर पुर्णपणे प्रदुषण मुक्त होणार आहे. त्यामुळे येथील आश्रम शाळेतील विद्यार्थी आणि नागरिकांनी नगराध्यक्षा शर्मिला सुर्वे आणि नगरपंचायतीचे आभार मानले आहेत.

यासाठी माणगांव नगरपंचायत प्रशासनाकडून सदर कामाची प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी सातत्याने प्रयत्न आणि पाठपुरावा करण्यात आला होता. या अनुषंगाने शासनाकडून सदर कामासाठी सुमारे १ कोटी रुपये इतक्या रक्कमेस प्रशासकीय मान्यता प्राप्त झालेली होती. माणगांव नगरपंचायत प्रशासनाकडून नागरिकांचे आरोग्यास निर्माण झालेला धोका लक्षात घेता, कामाची ई-निविदा प्रक्रियेची कार्यवाही पूर्ण करून सदर कामाचे कार्यादेश दिलेले आहेत. आता या कचऱ्याच्या ढिगाऱ्याचा निपटारा करण्यासाठी बायो मायनिंग तंत्रज्ञानाचा वापर करुन शास्त्रोक्त पद्धतीने तीन गटात या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात येत आहे. यातील ओल्या कचऱ्यापासून खत तयार केले जाणार आहे. प्लास्टीक कचरा कारखान्यांना देण्यात येणार आहे. यासाठी नगरपंचायतीने कचरा डंपिंगची समस्या मार्गी लावली आहे. या कामास मंजुरी मिळाल्यानंतर या कामाची निविदा काढून पुणे येथील संबंधित कामाचे अनुभवी असलेले पुणे येथील भाग्यदिपस् वेस्ट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे ठेकेदार तानाजी पवार यांना हे कंत्राट दिले असून साधारणत: महिनाभरात येथील कचऱ्यावर प्रक्रिया करुन हा डंपिंग ग्राउंड मोकळा करुन समस्या सोडविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

अत्यंत आवश्यक महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात आज १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त माणगांव नगरीच्या नगराध्यक्षा शर्मिला सुर्वे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आली आहे. तसेच यावेळी उपस्थित उपनगराध्यक्षा हर्षदा सोंडकर, आरोग्य व स्वच्छता सभापती सुशिला वाढवळ, नगरसेविका तथा माजी सभापती सुविधा खैरे, विद्यमान नगरसेवक तथा माजी पाणी पुरवठा सभापती राजेश मेहता, विद्यमान नगरसेवक तथा माजी स्वच्छता-आरोग्य सभापती अनुक्रमे अजित तार्लेकर, दिनेश रातवडकर, विद्यमान नगरसेवक तथा माजी उपनगराध्यक्ष सचिन बोंबले, नगरपंचायतीचे कर्तव्यतत्पर मुख्याधिकारी संतोष माळी व अधिकारी विशाल कदम, शहर समन्वयक अतुल जाधव आदी माणगांवकरांचे हस्ते श्रीफळ वाढवून कामाचा शुभारंभ करण्यात आला.

२० वर्षांपासून खितपत पडलेल्या समस्येच्या निराकरणामुळे माणगांवकर आता मोकळा श्वास घेतील आणि अनेक वर्षांपासून पडलेल्या शेकडो टन कचऱ्याचे ढिगारे साफ होणार असुन प्रदूषण युक्त गंभीर समस्येवर मात करण्यात येईल. यामुळे येथील नजिकच्या परिसरातील आश्रम शाळेतील शालेय विद्यार्थ्यी, येथील नागरिक आता मोकळा श्वास घेतील. हे अत्यंत महत्त्वपूर्ण काम सुरु झाल्याने समस्त माणगांवकरांनी समाधान व्यक्त केले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!