मुंबई : राज्यातील महायुती सरकारसाठी गेमचेंजर ठरलेली ‘लाडकी बहीण योजने’च्या नावाने नागरिकांची फसवणूक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जुहू पोलिसांकडून एका दाम्पत्यासह ४ जणांवर गुन्हा नोंदवून त्यांच्या जवळून मोठ्या प्रमाणात विविध नागरिकांची बॅंक खाती आणि इतर सहित्यांची कागदपत्र जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस तपासात या सर्व गैरव्यवहारामागे गुजरात कनेक्शन समोर आले आहे.
गुजरातमधील एक मोठी टोळी नागरिकांच्या नावाने बनावट खाती उघडून त्यांच्या खात्यावरील योजनांचे पैसे लुबाडत असल्याचे तपासात समोर आले आहे. विशेष म्हणजे नागरिकांची बनावट खाती उघडण्यासाठी कागदपत्र देणाऱ्यास काही हजारांचे कमिशनही दिले जात असल्याचे तपासात समोर आले आहेत. जुहू पोलिसांनी ६ जणांवर गुन्हा नोंदवून ४ जणांना आतापर्यंत अटक केली आहे. पोलिसांनी आतापर्यंतच्या तपासात १०० हून अधिक बनावट खाती बंद करण्यात यश आले आहे.त्यामुळे जवळपास १९ लाख हून अधिक रक्कम थांबवण्यात आली आहे. या प्रकरणी अधिक तपास जुहू पोलिस करत आहेत.
महाराष्ट्र सरकारनं जुलै २०२४ पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेद्वारे पात्र लाभार्थी महिलांना आतापर्यंत जुलै २०२४ ते मार्च २०२४ या कालावधीत ९ महिन्यांचे पैसे मिळाले आहेत. राज्याच्या महिला व बालविकास विभागातर्फे ही योजना चालवली जाते. त्यातच आता पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना दरमहा १५०० ऐवजी ५०० रुपये देण्यात आले आहेत.
