ठाणे : अंबरनाथ एमआयडीसीमधील केमिकल कंपनीला सायंकाळच्या सुमारास अचानक आग लागली. काही वेळातच आगीने भीषण रूप धारण केले असून धुराचे लोट किलोमीटर अंतरावरूनही स्पष्टपणे दिसत आहेत.
कंपनीमध्ये केमिकलचे साठे असल्याने आगीनंतर एकापाठोपाठ एक भीषण स्फोट झाले. या स्फोटांच्या आवाजामुळे अंबरनाथ परिसरात घबराट पसरली असून खबरदारी म्हणून आजूबाजूच्या कंपन्यांमधील कामगारांना तातडीने बाहेर काढण्यात आले. वाऱ्याचा वेग आणि आगीचा वाढता भडका यामुळे कंपनीच्या शेजारी असलेल्या इतर काही कंपन्यांनाही आगीची झळ बसली आहे. आगीचा अधिक प्रसार रोखण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत.
घटनेची माहिती मिळताच अंबरनाथ आणि उल्हासनगर महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. रसायनांची आग असल्याने फोम आणि पाण्याचा मारा करून आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
कंपनीत काही कामगार अडकल्याची प्राथमिक भीती वर्तवली जात आहे. घटनास्थळी रुग्णवाहिका आणि पोलीस प्रशासन सज्ज असून, आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतरच नेमका कोणाचे नुकसान झाले आहे किंवा कोणी जखमी झाले आहे का, याची माहिती स्पष्ट होईल.
