अब्दुल सोगावकर
सोगाव : मान्सूनपूर्व मुसळधार पावसाने अलिबाग तालुक्यातील किहीम ग्रामपंचायत हद्दीतील जनजीवन विस्कळीत झाले असून, किहीम सरपंच पिंट्या गायकवाड यांनी मंगळवार, दि. २६ मे रोजी ग्रामपंचायत हद्दीतील किहीम आदिवासी वाडी व बामणसुरे आदिवासी वाडी येथे जाऊन आदिवासी कुटुंबांची पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करून त्यांना दिलासा दिला. तसेच बेकायदेशीरपणे भराव व बांधकामे केलेल्या ठिकाणी पाणी भरल्याने नैसर्गिक मार्ग मोकळा करण्याच्या प्रशासनाला सूचना दिल्या.

मान्सूनपूर्व आलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र दाणादाण उडाली आहे. मुसळधार पावसामुळे जागोजागी विद्युत पुरवठा खंडित होऊन मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांची गैरसोय झाली आहे. वारंवार व तासनतास विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने महावितरण कंपनीचे पितळ उघडे पडले आहे. मान्सूनपूर्व कामांसाठी महावितरणकडून गेले दोन महिने आठवड्यातून दोन – दोन वेळा शटडाऊन घेऊन सुध्दा पहिल्याच पावसात वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने महावितरण कंपनीविरुद्ध संताप व्यक्त करण्यात येत आहे. यासोबतच पावसामुळे मोबाईल नेटवर्क सेवा देखील कोलमडुन गेली असल्याने मोबाईल फोन वापरकर्त्यांना देखील गैरसोयीसह इतर आर्थिक व्यवहार करताना अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने नेटवर्क सेवा देणाऱ्या कंपन्यांविरुद्ध संताप व्यक्त करण्यात येत आहे.
किहीम ग्रामपंचायतीचे कर्तव्यदक्ष सरपंच पिंट्या गायकवाड यांनी किहीम तलाठी ललिता शिर्के व इतर महसुली तसेच ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यासह प्रत्यक्षात पाहणी करून संबंधित मालकांना मार्ग मोकळा करून होणाऱ्या गैरसोयी दूर करण्यासाठी सूचना दिल्या. यासोबतच किहीम आदिवासी वाडी व बामणसुरे आदिवासी वाडी येथील गरीब आदिवासी बांधवांच्या घरांची झालेली पडझड यांची पाहणी करून दिलासा देत त्यांना सर्वोतोपरी सहकार्याचे आश्वासन दिले.