सलीम शेख
माणगाव : मुंबई-गोवा महामार्गावरील टेमपाले येथील उड्डाणपुलावर कारला ठोकर देत, ट्रक कारवर कोसळून भीषण अपघात झाला. सुदैवाने यामध्ये जीवितहानी झाली नसली, तरी चारजण जखमी झाले आहेत. हा अपघात गुरुवार, दि. ५ जून २०२५ रोजी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास घडला. या घटनेनंतर बराच काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
गोरेगांव पोलीस ठाण्याच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी संजय चंद्रभान चौधरी (वय २२, रा. वडाळा, मुंबई) हे आपल्या ताब्यातील एमएच ०८ एएन ६७८५ या क्रमांकाची कार घेऊन, मुंबईकडून गोव्याकडे जात असताना, महाडकडून माणगांवकडे येत असलेल्या एमएच १२ एचडी ३८३३ या क्रमांकाच्या ट्रक चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने, कारला समोरुन ठोकर दिली आणि त्यानंतर हा ट्रक कारवर कोसळला. हा अपघात इतका भीषण होता की, दोन्ही वाहने उड्डाणपुलावरुन खाली कोसळता कोसळता वाचली. त्यामुळे सुदैवाने यात जीवितहानी झाली नसली, तरी या अपघातात फिर्यादी संजय चौधरी, साहिल धर्मेंद्रकुमार गुप्ता (वय १९, रा. वडाळा-मुंबई), धनंजय चंद्रभान चौधरी (वय २०, रा. वडाळा मुंबई) आणि ट्रकचालक चंद्रकांत रामदास लडकत हे चौघे जखमी झाले. सर्व जखमींवर माणगांव उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
या अपघातांनतर महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. अपघाताची माहिती समजताच गोरेगांव पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी इतरांच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करुन वाहतूक सुरळीत करण्यात आली. या प्रकरणी गोरेगांव पोलीस ठाण्यात ट्रकचालक रामदास लडकतच्या विरोधात भारतीय न्याय संहिताचे कलम २८१,१२५ अ, १२५ ब यांसह मोटार वाहन कायमदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी गोरेगांव पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक विजय सुर्वे आणि पोलीस उपनिरीक्षक एस. एन. रासकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पी. के. घोडके हे अधिक तपास करित आहेत.