नागरिकांनी, शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे सर्पमित्रांचे आवाहन
अनंत नारंगीकर
उरण : सारडे गावातील महिला महादुबाई महादेव माळी (वय ७७) हिला सर्प दंश झाल्याने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले असता तीचा रस्त्यात मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि. ४) घडली. त्यामुळे नागरिकांनी अशा सर्पदंशाच्या घटनांपासून वाचण्यासाठी काळजी घेण्याचे आवाहन वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेने केले आहे.
उरण तालुक्यातील सारडे येथील महिला महादूबाई माळी ही महिला बुधवारी रात्री ८ च्या सुमारास घरामध्ये एकटीच होती. त्यावेळी सर्वत्र लाईटही गेल्याने तीने घराबाहेर पडताना बॅटरी घेतली नव्हती. तिच्या पायाला काहीतरी चावले असे जाणवले. तिला वाटले कि विंचू चावला असावा. परंतु काही वेळाने मुले घरी आली असताना तिला अस्वस्थ जाणवू लागले होते. तिच्या मुलांनी तिला तात्काळ उपचारासाठी उरणच्या रुग्णालयात नेले. मात्र उपचार वेळेवर न मिळाल्याने तीचा रस्त्यातच मृत्यू झाला. सदर महिलेचा मृत्यू हा विषारी साप चावल्याने झाल्याची माहिती तीच्या कुटुंबाकडून तसेच सर्प मित्रांकडून देण्यात आली.
सध्या उरणमध्ये पावसाळा बऱ्यापैकी सुरू झाला आहे. त्यामुळे सापांच्या बिळामध्ये पाणी जातं असल्याने साप भक्ष्याच्या शोधार्थ व आसऱ्याच्या शोधात मानवी वस्तीत येतात. त्यामुळे पावसाळ्यात सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. प्रत्येकाने पावसाळ्यामध्ये विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. महिला, पुरुष शेतकरी यांनी रात्री अपरात्री बाहेर पडतेवेळी बॅटरीचा वापर करणे गरजेचे आहे. बाहेर पडतेवेळी बूट वापरणे गरजेजे आहे. एखाद्या अडगळीच्या ठिकाणी अनेक दिवसांपासून वस्तू ठेवल्या असतील तर तिथे खात्री करूनच बाहेर वस्तू हाताळल्या पाहिजे, एखाद्या अडगळीच्या ठिकाणी काम करत असताना त्या ठिकाणी साप दबा धरून बसला आहे की नाही याची खात्री केली पाहिजे. कारण आपल्याला साप दंश करू शकतो. त्यामुळे आपली काळजी घ्या आणि सुरक्षित रहा आणि जर का सर्प दंश झाला असेल तर शासकीय रुग्णालयातच प्रथम पोहचण्याचा प्रयत्न करा असे आवाहन वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेच्या माध्यमातून सर्पमित्र तथा अध्यक्ष विवेक केणी यांच्याकडून करण्यात आले आहे.