• Thu. Jun 12th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

पावसाळी बंदी काळातही अवैधरित्या मासेमारी करणाऱ्या पाच बोटींवर मत्स्य विभागाची कारवाई

ByEditor

Jun 9, 2025

अनंत नारंगीकर
उरण :
पावसाळी मासेमारीस बंदी असतानाही अवैधरित्या मासेमारी करणाऱ्या बोटीवर कारवाई करीत लाखो रुपयाचा दंड वसूल केला आहे. ही कारवाई मत्स्य विभागाच्या परवाना विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली असून पाच मच्छीमार बोटी ताब्यात घेतल्या आहेत. मात्र, दरवर्षी अशाच प्रकारची कारवाई केली जाते परंतु बंदी झूगारून समुद्रात मासेमारी केली जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

पावसाळी हंगाम हा मत्स्य प्रजननाचा काळ असतो. १ जून ते ३१ जुलै या दोन महिन्यात मासेमारीसाठी शासकीय बंदी घालण्यात आली आहे. मात्र ही बंदी झूगारून बिनधास्त अरबी समुद्रात मासेमारी केली जात आहे. अशा जीवघेण्या मासेमारीत बोटीवरील खलाशांना आपले जीव गमावावे लागले आहेत. या संदर्भात अनेक वेळा जागरूक पत्रकारांनी आपल्या लेखणीतून आवाज उठविला. मात्र मत्स्य विभागाकडून वारंवार दुर्लक्ष केले जात असे. यावेळीही बंदी झूगारून मासेमारी करणाऱ्या बोटी समुद्रात गेल्या, तसेच अलिबाग, उरण सारख्या महत्त्वाच्या बाजारात मासळी विक्रीसाठी उपलब्ध होत असल्याची माहिती मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली होती. त्यामुळे मत्स्य परवाना विभागाच्या अधिकाऱ्यांनी सदर बाबींकडे दुर्लक्ष न करता लक्ष देऊन मासेमारी करणाऱ्या पाच बोटींवर कारवाई केली आहे.

अवैधरित्या मासेमारी करणाऱ्या जय गौरी नंदन, एकवीरा माता, श्री जागृत गौराई, भवानी जगदंबा, देवाची आळंदी या पाच मच्छीमार बोटी मत्स्य विभागाने ताब्यात घेऊन दंडात्मक कारवाई केली आहे. यापैकी एका बोटीकडून १ लाख ३० हजारांचा दंडही वसूल केला आहे. पारंपरिक बोटी वगळता, यांत्रिक मासेमारी बोटी खोल समुद्रात मासेमारी करतात. यामध्ये उरण, पेण आणि अलिबाग तालुक्यातील अनेक बोटी खोल समुद्रात जाऊन मासेमारी करतात. या माशांची विक्री उरण व अलिबाग सारख्या समुद्रकिनारी रात्रीच्या वेळी केली जाते. मासळी खरेदी करण्यासाठी मुंबई, नवीमुंबई, कल्याण, कर्जत व खोपोली परिसरातील व्यापारी येतात, अशी माहिती सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी यापुढे सतर्क राहणे गरजेचे असल्याचे मत सामान्य नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे.

पावसाळी हंगाम हा मत्स्य प्रजननाचा काल असतो, त्यामुळे १ जून ते ३१ जुलै या दोन महिन्यात मासेमारीसाठी शासकीय बंदी घालण्यात येत आहे. मात्र तरीही काही मासेमारी करणाऱ्या बोटी समुद्रात मासेमारी करण्यासाठी जात असल्याची माहिती मिळाल्याने तात्काळ दादर येथील १ व करंजा येथील ४ अशा प्रकारच्या एकूण पाच बोटींवर वरिष्ठांच्या आदेशानुसार मत्स्य विभागाच्यावतीने कारवाई करण्यात आली आहे.
सुरेश बाबूलगावे
अधिकारी मत्स्य परवाना विभाग, उरण.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!