अनधिकृत टॅप मारून बेकायदेशीर ढाबे, पार्किंग, गोदामधारकांकडून पाण्याची चोरी
घनःश्याम कडू
उरण : नागरिकांना मुबलक आणि शुद्ध पाणीपुरवठा होत नसताना आणि अनेकदा पाणी कपातीला सामोरे जावे लागत असतानाच बेकायदेशीर ढाबे, पार्किंग, गोदामांना बेसुमार पाण्याचा पुरवठा होत असल्याचे असल्याचे समोर येत आहे.
उरणला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ४ लगत असणारे अवैध व्यावसायिक जेएनपीटी बंदराच्या पाण्याच्या पाईपलाइनमधून पाणी चोरी करत असल्याचे उघड झाले आहे. अनेक ठिकाणी अशा प्रकारे टॅप मारून बेधडक पाणी चोरी केली जात असतानाही ह्यावर कोणतीच कारवाई होत नसल्याने अधिकाऱ्यांबाबत संशयाचे वारे वाहू लागले आहेत.

मे महिन्याच्या अखेरीस ते जुलै महिन्याच्या १५ दिवसांपर्यंत पाण्याचे नियमन हे महत्त्वाचे आहे. नागरिकांना पाणी पिण्यासाठी कपात केली जाते. नागरिकांसाठी मुबलक असे पाणी मिळत नाही. मात्र बेकायदेशीर ढाबे, पार्किंग, गोदामे या ठिकाणी सर्रासपणे पाणी चोरून वापरले जात आहे. रोजचे लाखो लिटरचे पाणी हे चोरून वापरले जाते. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वर जेएनपीटी परिसराला जोडणाऱ्या भागात पाईपलाईनला टॅप मारून थेट बेकायदेशीर पाइपजोडणी करून पाणी चोरले जात आहे. कुठेही कोणताही परवाना नाही, शासकीय मान्यता नाही पण पाणी मात्र अखंड वाहतंय आणि प्रशासन फक्त पाहातंय.
ही पाणी चोरी एक-दोन नळांची नसून संपूर्ण धाबे आणि ट्रक पार्किंग यार्ड सर्रास जनतेच्या वाट्याचा पाणी उधळत आहेत. उरणकरांना जे पाणी महिन्यातून एखादा दिवस मिळतं, ते हे चोरटे दिवसातभरात संपवून टाकतात.
सामन्यांचा पाण्याच्या थेंबासाठी हंबरडा…पण धाब्यांना धबधबा!
शहरातल्या महिलांना हंडाभर पाण्यासाठी लाईनमध्ये उभं रहावं लागतं, वृद्धांना रात्रभर जागरण करावं लागतं आणि दुसरीकडे ही पाणीचोर मंडळी सरकारी यंत्रणांच्या आडून भरभरून ‘धंदा’ चालवतायत.
या सगळ्या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर तत्काळ कठोर कारवाई करावी अन्यथा, जनतेचा संताप उरणच्या रस्त्यांवर ओसंडून वाहेल असा इशारा उरणच्या जनतेने दिला आहे.