गणेश पवार
कर्जत : सध्या महायुतीच्या घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटामध्ये कर्जत-खालापूर विधानसभा मतदार संघात पत्रकार परिषदेच्या माध्यमातू नेते मंडळीकडून एकमेकांवर आरोपाचे सत्र सुरु असून शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटामध्ये कोल्ड वॉर सुरू असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे पुढे होणाऱ्या कर्जत-खालापूर विधानसभा मतदार संघातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत याचा फटका महायुतीला बसरणार की महायुतीमधील घटक पक्ष असलेले भाजपा, शिवसेना की भाजपा-राष्ट्रवादी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांमध्ये एकत्रीत लढणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाडचे आमदार मंत्री भरत गोगावले यांच्या १ जून रोजीच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमामध्ये रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या विरोधात आमदार महेंद्र थोरवे यांनी जी गरळ ओकली होती त्यासंदर्भात कर्जत येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसंर्पक कार्यालयात रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी दि. ३ जून रोजी आयोजित पत्रकार परिषदेत सुनील तटकरे यांनी रुमाल उडविला तर यांची पळता भुई झाली आहे. आज जर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे असते तर याच गोगावलेचा रायगडच्या टकमक टोकावरून कडेलोट केला असता. आमदार थोरवे यांनी माथेरानच्या माजी नगराध्यक्षा यांच्या पतीवर केलेला हल्ला, नेरळमधील भर पब्लिकमध्ये तरूणाला थोरवेच्या माणसाकडून झालेली मारहाणीची घटना, खालापूर, खोपोली, कर्जत, माथेरान, नेरळ पोलीस स्टेशनच्या स्टेशन डायरीची गोपनीय माहिती ही अधिकारात मिळवली आहे. त्यामध्ये कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक असलेले अरूण भोर यांना सावेळी येथील गुन्हेगार यांना अटक न करण्याचे आमदार थोरवे यांचे आदेशाचे फोन, तर हवलदार जमदाडे यांना केलेली अर्वाच्च भाषा अशा आमदारांच्या कारनाम्याचा पाढा हा पत्रकारांसमोर सुधाकर घारे यांनी वाचून दाखवत, आमदार महेंद्र थोरवे हा कर्जतचा वाल्मीक कराड असुन, कर्जत तालुक्याचा बीडच नाही तर बिहार करायला घेतला असल्याचे जोरदार आरोप केले.
तरूणांच्या हाताला काम देण्याऐवजी त्यांना गुंडागिरीकडे वळवण्याचे काम कर्जतचे आमदार करीत आहे असा घणाघाती आरोप हा या पत्रकार परिषदेमध्ये सुधाकर घारे यांनी केला आहे. तसेच सांगवी गाव हे दरडग्रस्त गाव असल्याने मी, आदीतीताई व सुनील तटकरे यांच्या माध्यमातून मंत्री महोदयांना भेटून संरक्षण भिंतीच्या कामाकरीता पाठपुरावा करून ३० कोटीचा निधी मंजूर केला. मात्र, तो निधी इतरत्र फिरवण्यासाठी आमदार थोरवे यांनी संबंधित विभागाचे मंत्री यांना पत्र दिले आहे. जर सांगवी गावात दरड कोसळून एखादी जीवितहानीची घटना घडल्यास याला आमदार थोरवेच जबाबदार असतील. आमदार थोरवे यांनी गावकीचे तळे, वन विभागाच्या जागेत बांधलेले रिसॉर्ट व त्यांचे बंधू यांनी हडप केलेली गुरचरण जागा यांची प्रशासकीय चौकशी लावावी असे सुधाकर घारे यांच्याकडून आरोप करण्यात आले होते. तर न्हावाशेवा जमीन घोटाळ्यामध्ये आमदार यांचे हस्तक यांच्या मागे कोण आहे याची पोलिसांनी चौकशी करावी, तसेच पळसदारी तलावामध्ये सापडलेल्या एका महिलेचा मृतदेह या खून प्रकरणी पोलीस तपास का करत नाही? कुणाच्या दबावाला पोलीस बळी पडतात आहेत? याचे कारण शोधायला हवे.
गोगावले यांच्या कामाचा उल्लेख करताना आमदार महेंद्र थोरवे बोलले होते कि, गोगावले यांचे काम रायगडच्या उंची एवढे आहे. म्हणजे हा अप्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान आहे, असे पत्रकार परिषदेत नमूद करत व त्या कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा विसर पडल्याने आमदार महेंद्र थोरवे यांचा राष्ट्रवादीचे नेते भरत भगत यांनी जाहीर निषेध व्यक्त केला होता.
त्यानंतर दि. ६ जून रोजी कर्जतमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या पार पडलेल्या आढावा बैठकीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे कर्जत-खालापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी केलेल्या भाषणातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या विरोधात आरोपाची राळ उठवत, घारे यांच्यावर आपले खूप उपकार असल्याचे व आपल्या वडिलांना विचारा तुम्ही माझ्यावर टीका करताना परिसिमा बाळगली नाही. झालेला पराभव पचवायचा असतो, आम्ही देखील पराभव पचवला आहे. आपला पराभव का झाला याचे प्रथम आत्मचिंतन करा असा खोचक सल्ला देत थेट खासदार तथा राष्टवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना तुमची राजकीय ताकद आहे तर तुम्ही तुमच्या खासदारकीचा राजीनामा द्या मी ही माझ्या आमदारकीचा राजीनामा देतो व पुन्हा खासदार म्हणून निवडून येऊन दाखवा. माझ्या शिवसैनिकांवर माझा विश्वास असल्याने मी पुन्हा कर्जत-खालापूर विधानसभा मतदार संघातून आमदार म्हणून निवडून येईन असे आव्हान केले होते. तर राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस भरत भगत यांच्यावर एकेरी भाषेचा वापर करत, याला वाटते त्याच्यामुळे देश स्वातंत्र झाला अशी टीकाही भरत भगत यांच्यावर आमदार थोरवे यांनी करत, माझ्याकडून घेतलेले पैसे पहिले मला परत कर असा आरोप देखील भरत भगत यांच्यावर केला आहे.
आमदार थोरवे यांच्या एकेरी भाषेला व केलेल्या आरोपांना दि. ७ जून रोजी भरत भगत यांनी पत्रकार परिषद घेत तुझे पैसे मी कधीच घेतले नाही, मात्र मी अडचणीमध्ये असताना, माझ्या मुलाकडून तू अकरा लाख रूपये उकळले आहेस असा आरोप करत, तुझे पैसे मी घेतले असतील तर त्याचा हिशोब घेऊन कपालेश्वर मंदिरात ये, मीही माझे बँक डिटेल्स घेऊन येतो. कोणी कोणाचे पैसे घेतले हे जनतेसमोर येईल. अरे माझ्यामुळे देश स्वातंत्र्य झाला नाही, कारण माझा जन्म झाला नव्हता. मात्र त्या स्वातंत्र्य लढ्यात माझ्या वडिलांचा सहभाग होता. माझ्या वडिलांनी हुतात्मा भाई कोतवाल व हुतात्मा हिराजी पाटील यांच्या सोबत स्वातंत्र्य लढ्यात काम केले आहे. त्या काळामध्ये सावकारांनी गरीबांच्या लाटलेल्या जागा सोडविण्याचे काम हे हुतात्मा भाई कोतवाल व हुतात्मा हिराजी पाटील यांच्यासोबत माझ्या वडिलांनी केले आहे. याचा मला सार्थ अभिमान आहे. मात्र तू या तालुक्यातील गरीबांच्या जागा धापटशाही व दादागिरीच्या जोरावर लाटण्याचे काम करीत आहेस असे उत्तर आमदार महेंद्र थोरवे यांना भरत भगत यांच्याकडून देण्यात आले आहे.
हा सर्व प्रकार सध्या कर्जतमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर येत असल्याने, कर्जतमध्ये महायुतीच्या सरकारमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेना व राष्ट्रवादीमध्ये शीतयुद्ध सुरू असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे पुढे होणाऱ्या कर्जत-खालापूर विधानसभा मतदार संघात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत याचा फटका महायुतीला बसरणार की महायुतीमधील घटक पक्ष असलेले भाजपा व शिवसेना की भाजपा व राष्ट्रवादी हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका एकत्रीत लढणार याकडे मात्र सर्वांचे लक्ष लागले आहे.