• Tue. Jun 17th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

गोवंश हत्या प्रकरणी आक्षेप ,जासई येथे युवकावर हल्ला

ByEditor

Jun 16, 2025

महाराष्ट्र धाबा प्रकरणाचा संबंध असल्याचा कयास

अनंत नारंगीकर
उरण :
रविवारी रात्री उशिरा उरण तालुक्यातील जासई गावात एका युवकावर चार अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. जखमी युवकाचे नाव प्रेमसिंग यादव (वय अंदाजे ३०) असे असून, तो हिंदुत्ववादी कार्यकर्ता असल्याचे सांगितले जात आहे. काही दिवसांपूर्वी जासई महाराष्ट्र धाबा येथे गोवंश हत्या प्रकरणी आक्षेप घेतल्याचा राग मनात ठेवून हल्ला झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.

प्राथमिक माहितीनुसार, चार अज्ञात इसम दोन दुचाकींवरून (क्रमांक नसलेल्या) येऊन जासई गावाजवळ दबा धरून बसले होते. प्रेमसिंग यादव हा तरुण रात्री १२ वाजताच्या दरम्यान आपल्या घरी परतत असताना या चार जणांकडून त्याच्यावर हला करण्यात आला. या हल्ल्यात त्याच्या हातावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले असून, तसेच लोखंडी रॉडसारख्या वस्तूने पोटात व डोक्यावरही मारहाण करण्यात आली. प्रेमसिंग यांनी प्रसंगावधान राखत हातावर वार झेलले व तातडीने घटनास्थळावरून दूर पळून जाऊन स्वतःचा जीव वाचवला. या घटनेनंतर जासई गावातील काही स्थानिक युवकांनी त्यांना उरण येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तिथून पुढील उपचारासाठी त्यांना वाशी येथे हलवण्यात आले असता त्याच्या हाताला आठ टाके पडले असून, छातीच्या बरगड्यांनाही दुखापत झाली आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून, हातावर खोल जखमा असल्याचे सांगण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वी जासई येथील महाराष्ट्र धाबा येथे गोवंश हत्या करण्यात आली असल्याचा आरोप करत त्या संदर्भातील व्हिडीओ प्रेमसिंग यादव यांच्याकडून व्हायरल करण्यात आला होता. त्यानंतर याबाबत पोलिसांत देखील कळवण्यात आले होते. त्यानंतर धाबा चालकाकडून सिंग यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. यासंदर्भात उरण पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार देखील दाखल करण्यात आली. सिंग यांच्यावर झालेला हल्ला हा याच प्रकरणातून झाला असल्याचा संशय असून, हल्ला करते वेळीस हल्लेखोरांनी महाराष्ट्रात धाबा प्रकरणाचा उल्लेख केला असल्याचे सिंग यांनी म्हटले आहे.

या प्रकरणानंतर हिंदुत्ववादी संघटना एकवटल्या असून, संबंधित हल्लेखोरांना तात्काळ अटक करा आणि जासई येथील महाराष्ट्रात धाब्यासहीत तालुक्यातील सर्व बेकायदेशीर धाबे तात्काळ बंद करा आशी मागणी केली जात आहे.

फिर्यादीच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्र धाबा येथे गोवंश हत्या केल्याचा आरोप केल्याच्या प्रकरणावरून हा हल्ला झाला असावा. आम्ही ३२४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. आमची यंत्रणा कामाला लावली आहे, लवकरच हल्लेखोर पकडले जातील.
-जितेंद्र मिसाळ
वरिष्ठ पोलीस निरीक्षक, उरण

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!