१ कोटी ८५ लाखाचा निधी पाण्यात
शशिकांत मोरे
धाटाव : रोहा तालुक्यातील चिंचवली तर्फे आतोणे हद्दीतून पुढे भार्जे मार्गे पालीकडे जाणाऱ्या रस्त्याची एकाच वर्षात अक्षरशः दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावरून जाणाऱ्या टेम्पोचा रस्त्यावरील मोरी खचून मोठा अपघात झाला. सुदैवाने याठिकाणी जीवितहानी झाली नसून टेम्पोचे मात्र नुकसान झाले आहे. नेमका रस्ता नागरिकांसाठी की ठेकेदारांच्या चांगभल्यासाठी बनवला गेला? अशी चर्चा रंगत असून या रस्त्यासाठी वापरण्यात आलेला १ कोटी ८५ लाखाचा निधी फुकट गेल्याने विभागातील ग्रामस्थ संताप व्यक्त करीत आहेत.

मुंबई-गोवा महामार्गावरील पुगाव नजीकच्या नम्रता ढाबा येथून पुढे चिंचवली तर्फे आतोणे, भार्जे.मार्गे पालीकडे जाणारा हा एक नजिकचा आणि सोयीचा रस्ता आहे. त्यालाच जोडून असलेला एक रस्ता नांदगाव फाट्याकडे गेला आहे. सदर रस्ता दुर्गम भागातून गेल्यामुळे या रस्त्याला फार मोठी वर्दळ नसते. मात्र, या परिसरात डोलवहाल, ऐनवहाल ते पुढे चिंचवली तर्फे आतोणे, बल्हे, कांदळे अशी अनेक गावे येतात. दोन तालुक्याला जोडणाऱ्या या रस्त्याची ओळख असून सुस्थितीत नसल्यामुळे गेली अनेक वर्ष रस्ता रहदारीपासून वंचित होता. चिंचवली तर्फे आतोणे ते भार्जे पालीकडे जाणाऱ्या रस्त्याकरिता खासदार सुनील तटकरे यांनी निधी दिला आहे. त्यांच्या प्रयत्नातून हा रस्ता झाल्याने या परिसरातील गावांना पालीकडे जाणारा मार्ग सुखकर झाला. मात्र रस्ता जागोजागी खचून जाऊन काही ठिकाणी तडे पडले आहेत. तर रस्त्यावरील मोऱ्या सुद्धा खचल्या आहेत. 15 जूननंतर पावसाने आपली बॅटिंग आता जोरदार सुरू केली असल्यामुळे संततधार पडणाऱ्या पावसामुळे या रस्त्याची अशीच अवस्था होत राहिली तर रस्त्यावरून वाहतूक काही दिवसानंतर बंद होईल की काय? अशी भीती मात्र येथील नागरिकांना वाटत आहे.
ठेकेदारांनी रस्त्याला अक्षरशः चुना लावल्याने रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झालेले आहे. त्यामुळे एकाच वर्षात बांधण्यात आलेल्या मोऱ्या देखील खचल्या आहेत. रस्ता पूर्ण खराब झाला आहे. शासनाने दरी खोऱ्यातल्या वस्तीकरीता कोट्यावधी निधी देऊन सुद्धा तो निधी फुकट गेला आहे. त्यामुळे संबंधित खात्याने सदर ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी चिंचवली तर्फे आतोणे ग्रामपंचायतचे प्रभारी सरपंच संजय मोते यांनी केली आहे.