• Sat. Jun 21st, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

पावसाच्या तडाख्याने खरबाची वाडी येथे घर कोसळले; कुटुंबातील ५ जण सुदैवाने बचावले

ByEditor

Jun 19, 2025

एक दुचाकीसह घरातील सामानाचे प्रचंड नुकसान

शशिकांत मोरे
धाटाव :
संपूर्ण रायगड जिल्ह्यासह रोह्यातही झालेल्या वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाच्या तडाख्यामुळे तालुक्यातील चिंचोली तर्फे आतोणे ग्रामपंचायत हद्दीतील खरबाची वाडी (वडाची वाडी) येथील राजेश जाधव यांचे घर पूर्णतः कोसळले. हि घटना रात्री १२ वाजता घडली असून घरातील सामानाचे प्रचंड नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्याच्या आणि मुसळधार पावसामुळे घडलेल्या या घटनेत जाधव यांची दुचाकी व घरातील वापराचे अन्य साहित्य भिजले आहे. रात्री भर पावसात उघड्यावर राहण्याची वेळ आल्याने पावसाचा अंदाज घेऊन कुटुंबातील इतर मंडळींनी तात्पुरता शेजारच्या घराचा आसरा घेतल्याने सुदैवाने कुटुंबातील ५ जण बचावले आहेत.

खरबाची वाडी येथील घरमालक राजेश गोपीनाथ जाधव, पत्नी सविता राजेश जाधव, मुलगी वैष्णवी, मुलगा विनायक व राकेश असे पाच जण एकत्र कुटुंब या ठिकाणी राहत होते. रात्री प्रचंड वादळ आणि पाऊस झाल्याने राहत असलेले घर अचानक कोसळले. याठिकाणी जीवितहानी टळली असून स्वतःच्या मालकीची असलेल्या दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यासह एक टीव्ही, घरातील तांदूळ व नाचणी तसेच इतर भांडी, कपडे यांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

या घटनेचा तात्काळ पंचनामा करून आम्हा कुटुंबीयांना मदत मिळावी अशी मागणी जाधव यांनी केली आहे. तर चिंचोली तर्फे आतोणेचे प्रशासकीय अधिकारी रणजीत लवटे व ग्रामसेवक यांनी देखील जाधव कुटुंबीयांची भेट घेऊन कोसळलेल्या घराची पाहणी करून घटनेची माहिती घेतली आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!