विश्वास निकम
कोलाड: मुंबई-गोवा महामार्ग (क्रमांक ६६) वरील सुकेळी खिंडीत सततच्या मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याचा गंभीर धोका निर्माण झाला असून प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तातडीने संरक्षक भिंत आणि योग्य जलनिःसारण व्यवस्था उभारण्याची गरज आहे.
या परिसरात महामार्गाच्या कामासाठी दोन्ही बाजूंनी डोंगर पोखरून ठेवले असल्याने डोंगरमाथ्यावरील माती आणि दगड सैल झाले असून ते सरळ रस्त्यावर येत आहेत. परिणामी, वाहनचालकांना मोठा अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. शिवाय, रस्त्याच्या कडेला गटार नसल्यामुळे पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी मार्ग उपलब्ध नाही.

सुकेळी खिंड हे विरळ वस्तीचे आणि वळणावळणाचे ठिकाण असून इथे अचानक दरड कोसळल्यास वाहन चालकांना टाळण्याची संधीही मिळत नाही. अनेक प्रवासी आणि स्थानिकांनी प्रशासनाकडे त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
मुंबई-गोवा महामार्ग हे केवळ एक प्रवासमार्ग नसून या भागातून पर्यटनस्थळे, शैक्षणिक संस्था आणि औद्योगिक क्षेत्रांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. त्यामुळे वाहतूक सतत सुरू असते आणि अशा परिस्थितीत दरड कोसळल्यास मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी आणि जीवितहानी होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने या स्थितीकडे गांभीर्याने पाहून संरक्षणासाठी संरक्षक भिंतींचे काम व जलनिःसारण यंत्रणा प्राधान्याने पूर्ण करावी, अशी प्रवाशांची आणि स्थानिकांची मागणी आहे.