सलीम शेख
माणगाव : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे सततच्या होणाऱ्या विजेच्या खेळखंडोब्याने माणगाव शहरातील नागरिकांतून तीव्र संतापाच्या भावना उमटत आहेत.
माणगाव शहरात पावसाचे आगमन झाल्यापासुन दररोज तासातासाला वीज पुरवठा खंडित केला जात आहे. त्यामुळे नागरिकांची व दुकानदारांची अनेक कामे खितपत पडत असतात. तालुक्यातील ग्रामीण भागातून पाच ते दहा किलो मीटरच्या अंतरावरून नागरिक व विद्यार्थी विविध कामास्तव माणगाव शहरात येत असतात. या नागरिकांची व विद्यार्थ्यांची कामे विशेष करून सायबर केंद्र,बँका,पतसंस्थांतून विशेष कामे असतात. याठिकाणी वीज खंडित झाली असल्याने अनेकदा नेटवर्क नॉट रिचेबल दाखवीत असल्याने तसेच अनेक दुकानदारांची संगणकावरही कामे सुरु राहत असल्याने या सर्वाना या खंडित विजेचा फटका बसत आहे. ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना याचा विशेष फटका बसतो. या लोकांना तासनतास आपले काम कधी होईल यासाठी विजेची वाट बघावी लागते. प्रसंगी अनेक नागरिक कंटाळून पुन्हा आपल्या घरी निघून जातात. त्यांना हेच काम करण्यासाठी पुन्हा दुसऱ्या दिवशी माणगावात यावे लागते. त्यामुळे या नागरिकांचा वेळ व पैसे वाया जातो. शिवाय दुकानदारांचेही मोठे नुकसान होऊन त्यांनाही मनस्ताप होतो.
आजच्या या युगात अनेक कामे हि संगणकीकृत झाल्याने विजेची नितांत आवश्यकता असते. वीज सुरळीतपणे सुरु राहिली तरच संगणक व नेटवर्किंग व्यवस्थित राहत असते. अन्यथा वीज नसल्यास कामांमध्ये अडचण निर्माण होते. या गोष्टीकडे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन माणगाव शहरात सतत वीज पुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घ्यावी अन्यथा नाईलाजास्तव माणगावकरांना वीज मंडळावर मोर्चा काढावा लागेल असा इशारा नागरिकांतून देण्यात येत आहे.