अनंत नारंगीकर
उरण : तालुक्यात अतिवृष्टीच्या तडाख्यामुळे शेतकऱ्यांचे व रहिवाशांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून मदतीसाठी सरकारकडून ठोस पावले उचलली जात नसल्याचा आरोप शिवसेनेचे तालुकाप्रमुख संतोष ठाकूर यांनी केला आहे.
मागील वर्षी झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील भातशेती आणि फळबागायतींना नुकसान झाले होते. त्याबाबतची भरपाई अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नाही. त्यातच यावर्षी २६ मे रोजी पुन्हा झालेल्या अतिवृष्टीमुळे कळंबुसरे गावात १५० हून अधिक घरांचे आणि चिरनेरसह इतर गावांतील घरांचे छप्पर उडाले, संसार उद्ध्वस्त झाले.
या संकटात मदतीचा हात आमदार महेश बालदी, माजी आमदार मनोहरशेठ भोईर, महेंद्र घरत यांनी दिला असला तरी केंद्र व राज्यातील भाजप-मैत्री सरकारने अद्याप तातडीची आर्थिक मदत दिलेली नाही. पंचनाम्याच्या प्रक्रियेमुळे मदत रखडते आहे आणि शासनाने ती प्रक्रिया बाजूला ठेवून नुकसानग्रस्तांना त्वरित मदत द्यावी, अशी ठाकूर यांची ठाम मागणी आहे.
तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल तलाठी, ग्रामसेवक व कृषी विभागाकडून प्राप्त झाला आहे आणि तो शासनाकडे पाठवण्यात आला आहे. सरकारकडून लवकरच नुकसानभरपाई दिली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.
ठाकूर यांनी शेवटी सवाल उपस्थित केला की, सरकार गरीब, संकटग्रस्त जनतेचे आहे की केवळ भांडवलदारांचे? जनतेला न्याय देण्याची खरी परीक्षा सरकारसमोर उभी आहे.