राष्ट्रवादीत जाण्याविषयी कोणतीही चर्चा नाही : गीता पालरेचा
विनोद भोईर
पाली : सुधागड तालुक्यातील राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या गीता पालरेचा ह्या भाजपमध्ये होत असलेल्या घुसमटीमुळे पुन्हा राष्ट्रवादीत येणार असल्याची चर्चा काही दिवसांपासून वृत्तपत्रामध्ये छापून आलेल्या बातम्यांमुळे सूधागड तालुक्यासह रायगड जिल्ह्यात सुरू होती. ही चर्चा जोरात रंगली असतानाच गीता पालरेचा यांनी मंगळवारी (दि. ८) आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेत या चर्चेला पूर्णविराम दिला असून कोणी किती कुरघुड्या केल्या तरी आम्ही भारतीय जनता पार्टीतच राहणार असल्याचे स्पष्ट केले.
त्या पुढे म्हणाल्या की, भाजप हा फार मोठा पक्ष आहे. जनहितासाठी मी व माझे कार्यकर्ते यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून पक्षाच्या माध्यमातून आम्ही तालुक्यातील काही गावांमध्ये पक्ष निधीतून मोठ्या प्रमाणात विकास कामे देखील सुरू केली आहेत. कोणताही पक्ष झाला तरी तेथे जुने नवे वाद सुरूच असतात. यातून सामान्य कार्यकर्त्यांना त्रास होतच असतो हे काही नवं नाही अशीच थोडीफार परिस्थिती आमच्या वाट्याला आली आहे. पक्षाच्या नियोजित कार्यक्रमात कार्यकर्त्यांना निमंत्रण देणे टाळणे, एक सोपस्कर म्हणून एक तास आधी व्हाट्सअप द्वारे बैठकीचे निमंत्रण पाठवणे, निधी वाटपात कार्यकर्त्यांना विश्वासात न घेणे अशा विविध प्रकारच्या कुरघोडी काही स्थानिक वरिष्ठ पदाधिकारी करीत असल्याच्या तक्रारी कार्यकर्त्यांनी माझ्याकडे केलेल्या आहेत. या तक्रारीबाबत माझी वरिष्ठांशी चर्चा सुरू आहे. मात्र, कोणी कितीही त्रास देण्याचा प्रयत्न केला तरी मी आणि माझे सर्व सहकारी भारतीय जनता पार्टीतच राहणार असल्याचा ठाम आत्मविश्वास गीताताई यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून व्यक्त केला. यावेळी सदर पत्रकार परिषदेत त्यांचे सहकारी अभिजित चांदोरकर, रमेश साळुंखे उपस्थित होते.
आम्ही भारतीय जनता पार्टीत आल्याने ज्यांना कोणाला अडचण झाली असेल ते क्रोधापोटी कितीही कुरघोड्या करत राहिले तरी माझ्यावर आणि माझ्या कार्यकर्त्यांवर कोणताही परिणाम होणार नाही उलट माझे कार्यकर्ते आपापल्या विभागात पक्ष वाढीसाठी जोमाने काम करीत आहेत. त्याचा फायदा येणाऱ्या खासदारकीच्या निवडणुकीत पक्षाला नक्कीच होईल.
गीताताई पालरेचा