प्रतिनिधी
रायगड, दि. १२ : छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा साक्षीदार आणि मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासाची राजधानी ठरलेल्या रायगड किल्ल्याला काल युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेज दर्जा दिला. या ऐतिहासिक निर्णयाचा आनंद होत असतानाच दुसऱ्याच दिवशी रायगड किल्ल्यावर वसलेल्या धनगर वस्तीला गड खाली करण्याचे आदेश देण्यात आल्याने संतापाची भावना पसरली आहे.
काल (११ जुलै) युनेस्कोने १२ मराठा किल्ल्यांना जागतिक वारसास्थळाचा दर्जा दिला, त्यात रायगडचा समावेश आहे. परंतु आज (१२ जुलै) रायगड जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने पुरातत्व विभागाकडून धनगर समाजाच्या घरांना हटवण्याच्या नोटिसा देण्यात आल्या.
बाजारपेठेच्या मागील भागात आणि जगदीश्वर मंदिरासह परिसरातील धनगर वस्तीमध्ये सुमारे २२ झोपडीवजा घरे आहेत. मागील सात पिढ्यांपासून धनगर समाजाचे लोक येथे वास्तव्य करत असून पर्यटकांना दही, ताक, चहा व नाश्ता पुरवून ते आपला उदरनिर्वाह करतात.
मे महिन्यात केंद्रीय पुरातत्व विभागाने प्रथम नोटिसा पाठवल्या, त्यानंतर आता जिल्हा प्रशासनाने कारवाईसाठी पावले उचलली आहेत. परंतु रहिवासींनी “आम्हाला पर्यायी घर न देता हटवणे अन्यायकारक आहे” असा ठाम विरोध केला आहे. गड सोडला तर उदरनिर्वाह कसा होणार, मुलांचे भविष्य काय?” असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत.
युनेस्कोच्या दर्ज्यामुळे गडाच्या जतनाला गती मिळणार असली तरी गडावर अनेक पिढ्यांपासून वास्तव्य करणाऱ्या धनगर समाजाला गड खाली करण्याचे आदेश देणे हा सामाजिक समतेचा, संवेदनशीलतेचा आणि मानवतेचा मोठा प्रश्न बनला आहे.