अमुलकुमार जैन
अलिबाग, ता. १३ : मुरूड तालुक्यातील प्रसिद्ध फणसाड डॅम येथे वर्षासहलसाठी आलेल्या मुंबईतील पर्यटकांच्या गटात एक दुर्दैवी घटना घडली. अंधेरी येथील साहिल राजू रणदिवे (वय २४) या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असून या घटनेमुळे पर्यटकांमध्ये शोककळा पसरली आहे.
मुंबई अंधेरी येथील अकरा जणांचा गट रविवारी, १३ जून रोजी बोर्लीमार्गे फणसाड डॅमवर वर्षासहलसाठी पोहोचला. दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास साहिल रणदिवे डॅमच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरला. काही क्षणांतच तो बेपत्ता झाला.
याबाबत दिपक नारायण पांचाळ (रा. अंधेरी, मुंबई) यांनी रेवदंडा पोलीस ठाण्यात मिंसिंगची तक्रार नोंदवली. सायंकाळी डॅमच्या पाण्यात शोध घेत असताना साहिलचा मृतदेह सापडला. या प्रकरणाचा पुढील तपास रेवदंडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दिपक म्हशीलकर करत आहेत. पाण्यातील सुरक्षितता आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या उपाययोजनांबाबत अधिक माहिती घेण्यात येत आहे.