खांब ग्रामपंचायतीचा अजब कारभार
विश्वास निकम
कोलाड : रोहा तालुक्यातील नामवंत असलेली तसेच भोंगळ कारभारात चर्चेत असलेली खांब ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभारावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. केवळ स्थानिक पुढारी ठेक्यासाठी कोणालाही न जुमानता एका पाठोपाठ एक शासकीय इमारतीवरच हातोडा मारत आहे. ग्रामपंचायत आवारातील गट क्रमांक ११ या जागेत रायगड जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत राष्ट्रीय विस्तार योजनेंतर्गत सन १९७८ साली पक्के बांधकाम करून शाळा उभारली गेली होती. त्यावरच आता शासकीय परवानगी न घेता केवळ दुसऱ्या ठेक्यासाठी ही इमारत तोडण्यात आल्याने ग्रामपंचायतीच्या या मनमानी कारभारावरून एकच खळबळ उडाली आहे.

खांब ग्रामपंचायतीत गेली अनेक वर्षे एकहाती सत्ता असल्याने या हद्दीत अनेक विकासकामे ही मनमानी तसेच कामचलाऊ पद्धतीने केली जात असल्याची नेहमीच बोंब आहे. त्यामुळे ठेका घेण्याच्या वेळेला शासकीय इमारत पाडायची आणि त्या जागेवर दुसरी इमारत उभी करायची त्यामुळे केवळ ठेक्यासाठी सदरच्या जागेत असलेल्या इमारतीत ग्राम कॉटर्स तद्नंतर भाजी मार्केट आणि आता चक्क जुनी प्राथमिक शाळेची इमारत ग्रामस्थांना विश्वासात न घेता विनापरवानगी पाडण्यात आली तसेच ती पाडण्याबाबत कोणताही ठराव घेण्यात आला नसल्याचे समजते.
केवळ विकासाचे नाव आणि ठेक्याचा अट्टहास हाच कारभार सदरच्या ग्रामपंचायतमध्ये सुरू असून ग्रामपंचायत हद्दीतील ठेक्यासाठी इमारतीच गायब करणे हे खांब ग्रामपंचायतीला नवीन नसल्याचे सर्वत्र बोलले जात आहे. राजकीय वर्तुळात स्थानिक पुढाऱ्यांचा हम करेसो कायदा त्यामुळे कामाचा ठराव असला काय आणि नसला काय ही भूमिका कायम राहिल्यामुळे याबाबत संबधित अधिकारी वर्गाकडे स्थानिक ग्रामस्थ नागरिकांनी अनेकदा तक्रार केली तरीही त्याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. कोरोना कालापासून अनेक ग्रामपंचायतीमध्ये मनमानी कारभार सुरू झाला आहे. त्यात काही ठिकाणी अपहार देखील झाला आहे. त्यांची आजपर्यंत अधिकारी केवळ चौकशीच करत आहेत.
तालुक्यात अनेक ठिकाणी अपहार होत असल्याची चर्चा आहे तसेच तालुक्यातील तळवली तर्फे अष्टमी या ग्रामपंचायतमध्ये देखील हाच प्रकार घडला होता. या ग्रामपंचायतमध्ये देखील कोणताही ठराव अथवा परवानगी न घेता येथील ग्रामपंचायतीची जुनी इमारत तत्कालीन सरपंच यांनी पाडली होती. तर काम न करताच सदरच्या नव्या ठेक्याचे बिल लाटले असल्याचे समजताच विरोधक तसेच चिल्हे ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत संबधित अधिकारी वर्गाकडे तक्रार केली. त्यावर नेमलेले चौकशी अधिकारी यांची चालढकल सुरु होती. अखेर सर्वच स्थरावर चौकशीची मागणी होताच प्रशासनाला जाग आली आणि त्याची चौकशी करत सरपंच यांना दोषी ठरवत पदच रद्द करण्यात आले. मात्र अद्याप अपहार झालेली वसुली बाकी आहे. ग्रामपंचायतीमध्ये मनमानी पद्धतीने गावचे कारभारी ठेक्यासाठी काम करत असलेल्या पुढाऱ्यांवर कोणाचे नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे.
खांब ग्रामपंचायत हद्दीतील गट क्रमांक ११ मधील जमीन ही मुंबई गोवा महामार्गाच्या कामात गेली आहे तर त्याचा मोबदला गुलदस्त्यातच असल्याचे बोलले जात आहे. खांब ग्रामपंचायतीच्या हद्दीतील इमारत पाडण्यात आली असून याबाबत वरील विषयांतार्गत याची माहिती घेण्यासाठी येथील ग्रामसेवक पातेरे यांना संपर्क साधला परंतु संपर्क होऊ न शकल्याने याबाबतची अधिक माहिती मिळू शकली नाही. जुनी इमारत पाडण्यात आली आहे हे जरी सत्य असेल तरी ती पाडण्याचा ठराव अथवा परवानगी नसल्याचे ग्रामस्थांकडून बोलले जात आहे.
एक महिन्यापूर्वी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचा पदभार स्वीकारला आहे तसेच सदरच्या कामाबाबत ग्रामस्थांनी संबधित अधिकारी वर्गाकडे लेखी तक्रारी अर्ज केल्यानंतर सदरच्या कामाला वरीष्ठ पातळीवरून स्थगिती देण्यात आली आहे. याकामाबत परवानगी अथवा ठराव मंजूर करून घेतला की नाही याची चौकशी सुरू आहे.
–कांचन मोहिते
सरपंच, ग्रामपंचायत खांब
खांब येथील गट नंबर ११ सदरच्या जागेत राजिप ची जुनी शाळा होती. ती येथील ग्रामपंचायत पदावर असलेल्या पदाधिकारी यांनी कोणताही ठराव अथवा परवानगी नसताना जुनी इमारत तोडण्यात आली. ही सरकारी इमारत अचानक ठेक्यासाठी पाडण्यात आली आहे. तसेच ग्रामपंचायतीमध्ये नविनी विकासकामे ईमारती बांधल्या जातात तर त्याच तोडून पुढच्या काळात त्या जागेवर पुन्हा नवीन बांधल्या जातात येथिल ग्राम क्वाटर्स पाडून तिथे मच्छी मार्केट बांधण्यात आले त्याचीही अवस्था गंभिर आहे. भाजी मार्केट पाडून तिथे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात आले त्यामुळे भाजी मार्केट, दवाखाना आता राष्ट्रीय विस्तार योजने अंतर्गत ही जुनी इमारत बांधण्यात आली होती तर ठेक्यासाठी शासकीय इमारतीच गायब करत आल्याने या गोष्टीची खांब ग्रामस्थांनी 13 मार्च 2023 रोजी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड जिल्हा परिषद, मा. जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) तसेच गटविकास अधिकारी पंचायत समिती रोहा यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल करून सुद्धा ग्रामस्थांच्या अर्जाची आजतागायत दखल घेतली गेली नाही. हा विषय मा. शिक्षण मंत्री तसेच ग्रामविकास मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या दरबारी नेणार असल्याचे ग्रामस्थांनी ठरवले आहे. ग्रामस्थांच्या सहनशीलतेचा अंत शासकीय अधिकारी वर्गाने पाहू नये. लेखी तक्रारी अर्ज संबंधित अधिकारी वर्गाकडे केली असून याबाबतची कसून चौकशी करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.
–दिलीप लाडगे,
सामाजिक कार्यकर्ते, खांब