रायगड : रायगड जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पोलादपूर-महाबळेश्वर (आंबेनळी घाट) आणि वरंध घाट वाहतूकीवर निर्बंध लावण्यासंदर्भात अधिसूचना प्रसिद्ध केली होती. परंतु सद्य परिस्थिनुरूप नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सदर आदेश शिथील करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनी दिली.
पोलादपूर-महाबळेश्वर (आंबेनळी घाट) हा सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचे निर्देश दि. 28 जुलै 2023 रोजी रायगड-अलिबागच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी दिले होते. त्यामुळे आंबेनळी घाट हा सर्व प्रकारच्या वाहतूकीसाठी पुढील १५ दिवसांकरीता बंद करण्यात आला होता. तसेच वरंध घाट परिसरात मुसळधार पावसामुळे मार्गावरील घाटात दरड कोसळण्याचा घटनेमुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965 राजापूर ते रायगड जिल्हा हद्दीत आदेश देण्यात आल्याने 1 जुलै ते 30 सप्टेंबर 2023 या कालावधीत घाटातील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. या दोन्ही अधिसूचना पुढील आदेशापर्यंत शिथिल करण्यात आल्या आहेत.